प्रतिनिधी / मडगाव
कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने राज्यात कर्फ्यु जारी केला होता. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू व बांधकाम साहित्य सोडल्यास अन्य सर्व दुकाने बंद होती. मात्र, आज सोमवारपासून कर्फ्युच्या काळात पावसाळय़ातील सामानाची विक्री करण्यास सरकारने मुभा दिल्याने मडगाव शहरातील असंख्य दुकानदारांनी समाधान व्यक्त केले आहे. आजपासून दुकानदार रेनकोट व छत्र्यांची विक्री करणार आहे.
सरकारने 14 जून पर्यंत कर्फ्युत वाढ केली आहे. मात्र, या काळात पावसाळय़ातील सामान विकण्यास दुकानदारांना मोकळीक दिली आहे. त्यामुळे दुकानदार आजपासून रेनकोट, छत्र्या तसेच प्लास्किटची विक्री करणार आहेत. दरवर्षी मडगाव शहरातील दुकानदार पावसाळय़ातील सामानाची मोठय़ा प्रमाणात खरेदी करतात. मात्र, गेल्या वर्षापासून त्यांना कोरोना महामारीमुळे जबरदस्त फटका बसलेला आहे. यंदाही दुकानदारांनी पावसाळय़ासाठी लागणारे रेनकोट व छत्र्या खरेदी केल्या होत्या. मात्र, सरकारने कर्फ्यु जारी केल्यामुळे त्यांना आपल्या सामानाची विक्री करणे शक्य झाले नव्हते.
मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कर्फ्यु वाढ करताना पावसाळय़ातील सामान विक्री करण्याची मुभा दुकानदारांना दिलेली आहे. सरकारच्या या निर्णयावर मडगावच्या ‘क्रिस क्रॉस’ आस्थापनाचे मालक अनिल रहेजा यांनी समाधान व्यक्त केले असून दुकानदारांना थोडाफार दिलासा मिळणार असल्याचे म्हटले आहे. दरवर्षी आम्ही पावसाळय़ासाठी रेनकोट व छत्र्या आगावू खरेदी करतात. लोखो रूपयांचा माल सद्या दाखल झालेला आहे. त्याची विक्री करण्याची संधी दिल्याने दुकानदार आज सोमवारपासून आपल्या मालाची विक्री करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मडगाव न्यू मार्केट टेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी तर गेल्या आठवडय़ात मार्केट खुले करावे अशी मागणी केली होती. मात्र, जो पर्यंत सरकार अधिकृत घोषणा करीत नाही तो पर्यंत मार्केट खुले करणे शक्य नसल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले होते. आजपासून मडगावचे न्यू मार्केट पावसाळय़ातील सामानाची विक्री करण्यासाठी खुले केले जाणार आहेत. सरकारने हाच निर्णय अगोदर घेतला पाहिजे होता. कारण, अनेकांनी या पूर्वीच वाहनातून व रिक्षातून रेनकोट व छत्र्या तसेच प्लास्टिकची बेकायदेशीर विक्री केली होती. त्यामुळे मार्केटातील दुकानदारांवर अन्याय झाल्याची प्रतिक्रीया श्री. शिरोडकर यांनी व्यक्त केली आहे.