प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची माहिती : सभा सर्वांसाठी खुला
प्रतिनिधी / पणजी
विविध प्रकल्पांच्या विरोधात गोव्यात जनक्षोभ उसळला असून त्या जनतेला साथ देण्यासाठी तसेच सरकारच्या विरोधात जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी मडगाव येथील लोहिया मैदानावर शनिवार दि. 7 रोजी सायंकाळी 4 वा. जाहीर सभा आयोजित केली आहे. सभा सर्वांसाठी खुली असून एनजीओ आंदोलनकर्ते व इतरांनी त्यात सहभागी व्हावे आणि सरकारच्या विरोधात आवाज उठवावा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केले आहे.
काँग्रेसच्या बॅनरखाली ही सभा होणार नसून सरकारविरोधी जनतेकरीता सभा आहे. त्या सर्व प्रकल्पांवर सार्वजनिक सुनावणी घ्यावी, अशी मागणी चोडणकर यांनी केली.
पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आयआयटी, कोळसा वाहतूक, रेल्वे दुपदरीकरण, मोले वीज योजना अशा विविध प्रकल्पांना सध्या गोव्यातील जनतेचा मोठा आणि वाढता विरोध होत असून जनता आता रस्त्यावर आली आहे. तरीदेखील हे सरकार जनतेचे ऐकायला तयार नाही आणि त्या विरोधाची दखल घेत नाही. किंमतही देत नाही. उलट ते प्रकल्प जबरदस्तीने जनतेवर लादू पाहात आहेत. त्यामुळे लोक चवताळले असून त्यांचा संताप वाढत आहे. त्या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी ती सभा असल्याचे चोडणकर म्हणाले.
त्या प्रकल्पांचा गोव्याला आणि गोव्यातील जनतेला कोणताच फायदा नाही तर त्यामुळे गोव्याचे मोठे नुकसान होणार असून ते प्रकल्प धोकादायक ठरणार आहेत. गोव्याची अस्मिता संपुष्टात येणार असून ती टिकवायची असेल तर आता रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय नाही, असे चोडणकर यांनी नमुद केले. रेल्वे दुपदरीकरणाच्या विरोधी आंदोलनास जातीय रंग देण्याचे काम भाजपवाले करीत असून त्यात ढोल ताशे वाजवणारे असल्याने ते सर्वधर्मिय आंदोलन होते, असे ते म्हणाले. प्रतापसिंह राणे मुख्यमंत्री होते, तेव्हा प्रादेशिक आराखडय़ाविरोधात आंदोलन झाले आणि तो आराखडा राणेंनी रद्द केला. दिगंबर कामत मुख्यमंत्री असताना सेझाविरोधात आवाज झाला तेव्हा त्यांनी सेझा रद्द केल्याची माहिती चोडणकर यांनी दिली.
गोव्याची वनसंपदा नष्ट करू नका : प्रतापसिंह राणे
गोव्याची वनसंपदा महत्वाची असून ती राखली पाहिजे. प्रकल्पाच्या नावाखाली ती नष्ट करू नका, असे निवेदन माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी केले. ते मोठे प्रकल्प कोणच्याही फायद्याचे नाहीत. गोव्यात कोकण रेल्वे असताना आणखी दोन ट्रकची गरज नाही. गोव्याची वने संपवली तर पर्यटन संपणार, असा इशारा त्यांनी दिला आणि आयआयटी प्रकल्प इतरत्र न्यावा, असे पुन्हा एकदा बजावले.
प्रकल्प गोव्याच्या हिताचे नाहीत : दिगंबर कामत
जनतेचा विरोध होणारे हे प्रकल्प गोव्याच्या हिताचे नाहीत तर ते गोवा संपवण्याचा धोका आहे. जनतेचा आवाज ऐकून सरकारने शहाणे व्हावे, आणि जनतेच्या मागणीचा मान राखावा, असे मत कामत यांनी प्रकट केले.