प्रतिनिधी / मडगाव
कोरोना महामारीच्या विरोधात लढा देण्यासाठी सरकारने काल रविवारपासून संचारबंदी जारी केली. सकाळच्या सत्रात जनतेला जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याची मोकळीक ठेवल्याने सकाळच्या सत्रात मडगावच्या बाजारपेठेत लोकांची उपस्थिती दिसून आली. मात्र, दुपारी 1 नंतर संचारबंदीला चांगला प्रतिसाद लाभला
सकाळच्या सत्रात 7 वाजल्यापासून लोकांची जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी वर्दळ होती. मात्र, नेहमी प्रमाणे लोकांची बाजारपेठेत गर्दी नव्हती. मडगावची बाजारपेठ म्हटली की, लोकांची गर्दी हमखास असते. मात्र, गेल्या काही दिवसापासून लोकांची गर्दी बरीच घटल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
काल तर सकाळच्या सत्रात अवघ्याच लोकांनी उपस्थिती लावून जीवनावश्यक सामान खरेदी केले. दुपारी एक वाजता जीवनावश्यक वस्तूची दुकाने बंद झाल्यानंतर संध्याकाळच्या सत्रात मडगाव शहरातील बहुतेक रस्त्यावर शुक्षूकाट होता. अवघीच दुचाकी व चार चाकी वाहने सोडल्यास अवजड वाहनांची वाहतूक देखील बंद होती. खाजगी बसगाडय़ा तर बंदच ठेवण्यात आल्या होत्या. कंदबाच्या मोजक्याच बसगाडय़ा काल सुरू होत्या.
मडगावच्या न्यू मार्केटच्या सर्व गेट दुपारी 1 नंतर टाळे लावून बंद करण्यात आल्या. गांधी मार्केटात ही अशीच परिस्थिती होती. गांधी मार्केट व रोपा आळ परिसरात पोलीस तैनात होते. विनाकारण फिरणाऱयांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात होती. स्टेशनरोडवर मात्र, बेवारशी लोकांची उपस्थिती आढळून आली.
मडगाव प्रमाणेच फातोर्डा परिसरात देखील संध्याकाळच्या सत्रात संचारबंदी यशस्वी झाली. फातोर्डा, बोर्डा, आगाळी परिसरातील सर्व आस्थापने बंद ठेवण्यात आली होती. फार्मसी सोडल्यास अन्य कोणतीच दुकाने संध्याकाळच्या सत्रात खुली नव्हती. मडगावच्या पिंपळकट्टय़ाजवळ काल भल्या पहाटे आंब्याचा तसेच भाजीपाल्याचा बाजार भरला होता. कोरोना महामारीच्या सर्व नियमाचे पालन करून हा बाजार भरला होता. सद्या आब्यांचा हंगाम जोरात आहे. पीकलेले आंबे जास्त दिवस टीकू शकत नसल्याने शेतकरी तसेच व्यापारी मालाची खरेदी-विक्री करण्यासाठी धडपडत आहेत. सरकारने खास करून गावठी भाजीपाला तसेच आंब्याचा बाजार भरविण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी शेतकरी व विक्रेत्यांनी केली आहे.