प्रतिनिधी / पणजी
काँग्रेस पक्षातून भाजापात आलेले दहा व मगोतून भाजपात आलले दोन एकूण बारा आमदारावरील अपात्रतेच्या बाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निवाडय़ाचे भाजप स्वागत करीत असल्याचे भाजपचे सरचिटणीस नरेंद्र सावईकर यांनी सांगितले. सभापती राजेश पाटणेकर यांनी जो निवाडा दिला होता तोच उच्च न्यायालयाने उचलून धरला आहे. सभापती पाटणेकर यांनी दिलेला निवाडा योग्य होता. त्यामुळे पाटणेकर अभिनंदनास पात्र ठरत आहे. असेही सावईकर यांनी सांगितले.
पणजीतील भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत नरेंद्र सावईकर बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर तसेच भाजपचे प्रवक्ते सिद्धार्थ कुंकळीकर उपस्थित होते. मगो आणि काँग्रेसमधून आलेल्या त्या बारा आमदारांनी केवळ राज्याला स्थिर सरकार मिळावे व राज्याच्या विकासाला सहकार्य करावे म्हणून योग्य पध्दतीने निर्णय घेतला होता. असेही सावईकर यांनी सांगितले.
बारा आमदारांचा राजीनामा आणि अपात्रता याचीका याबाबत कित्येक दिवसांपासून राज्यातील विविध माध्यमातून चर्चा सुरु झाली होती. बारा आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी काँग्रेस आणि मगो पक्षाने हर तऱहेने प्रयत्न केले होते. बारा आंमदारांनी भाजप प्रवेश हा कायद्याच्या आधारेच होता. केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेसने विविध माध्यमातून चर्चा सुरु ठेवली होती. आता उच्च न्यायालयाने 89 पानाचा जो निवाडा दिलेला आहे त्यात सर्व काही स्पष्ट झाले आहे. आता या साऱया गोष्टींना पूर्णविराम मिळाला आहे असेही सावईकर म्हणाले.
राज्याला स्थिर सरकार मिळावे आणि राज्याच्या विकासकामात आमचा हातभार लागावा यासाठीच आम्ही कायद्याच्या आधारे भाजपात प्रवेश केला होता. असे बाबू कवळेकर यांनी सांगितले. काँग्रेसने केवळ आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेने कौल देऊनही काँग्रेसला सरकार करता आले नाही. काँग्रेसच्या काही नेत्यांना केवळ आपला स्वार्थ महत्वाचा वाटत होता जनतेच्या प्रश्नांचे त्यांना काही घेणे देणे नव्हते. ज्या मतदारांनी आम्हाला निवडून दिले होते त्यांच्यासाठी आम्हाला काम करायचे होते म्हणून आम्ही तो निर्णय घेतला होता. आम्ही घेतलेला तो निर्णय योग्य होता असे वाटत आहे. न्याय देवतेने योग्य कौल दिलाच असून जनतेचाही चांगलाच कौल मिळणार यात शंकाच नाही. 10 मार्च नंतर भाज पुन्हा सरकार स्थापन करेल याचा आम्हाला विश्वास आहे. असेही कवळेकर म्हणाले.