विनयभंगप्रकरणी पालिका कर्मचारी संघटनेची मागणी : अन्यथा लॉकडाऊनचे नियम झुगारून पुढील कृती करण्याचा इशारा
प्रतिनिधी / मडगाव
मडगाव पालिकेतील एका महिला कर्मचाऱयाने मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार केल्यानंतरही यासंदर्भात सरकार मुख्याधिकाऱयांना निलंबित करून चौकशी करत नसल्याने गोवा पालिका कर्मचारी संघटनेने पुन्हा एकदा तीव्र संताप व्यक्त केला आहे. सरकार या अधिकाऱयाची पाठराखण करत असल्याचे स्पष्ट होत असून लवकरात लवकर कारवाई न झाल्यास लॉकडाऊनचे नियम झुगारून संघटनेला आवश्यक कृती करणे भाग पडेल व त्यास सरकार पूर्णता जबाबदार राहील, असा इशारा संघटनेने दिला आहे.
संघटनेचे सरचिटणीस अनिल शिरोडकर यांनी ध्वनिफीत जारी करून सदर इशारा दिला आहे. संघटनेकडे मार्च महिन्यात या महिलेने तक्रार केल्यानंतर आम्ही मुख्य सचिव, नगरविकास सचिव, पालिका संचालक व अन्य संबंधित अधिकारिणींकडे पत्रव्यवहार करून मुख्याधिकाऱयांना निलंबित करून कारवाई करण्याची मागणी केली होती. आठवडाभराची मुदत त्यासाठीं दिली होती. महिना उलटला, तरी त्याबाबत कोणतीही हालचाल झाली नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा स्मरणपत्र पाठविले व मुदत दिली. त्यास आता दोन महिने झाले, तरी काहीच कारवाई होत नसल्याने संघटनेला स्वतःहून कारवाई करावी लागेल, असा इशारा शिरोडकर यांनी दिला आहे.
…म्हणून कारवाई होत नसावी
सदर मुख्याधिकारी तक्रारदार महिलेवर दबाव आणत असून अलीकडेच त्यासंदर्भात एक ध्वनिफीत व्हायरल झाली होती. त्यातून एक माजी नगरसेवक एका माजी आमदाराला घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊया व सामोपचाराने हे प्रकरण निस्तारूया असा धमकीवजा सल्ला या पीडित महिलेला देत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे सरकारकडून या विनयभंग करणाऱया अधिकाऱयाची पाठराखण होत असावी आणि सरकारच्या दबावामुळेच मुख्य सचिव त्यांना निलंबित करण्यास कचरत असावेत, असा संशय शिरोडकर यांनी व्यक्त केला आहे.
पालिका मंडळाने चर्चेसाठी स्वारस्य दाखविले नाही
विनयभंगसारखे प्रकरण होऊनही पालिका मंडळाने यासंदर्भात खास बैठक घेऊन चर्चा करण्याचे स्वारस्य दाखविलेले नाही. तसेच पालिका मंडळावर स्वीकृत सदस्य असलेल्या मडगाव, फातोर्डा व कुडतरी मतदारसंघांच्या आमदारांनीही चकार शब्द न काढल्याबद्दल शिरोडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पीडित महिला दिव्यांग असून दिव्यांगांसाठी सरकारचा आयोग आहे. मात्र त्यानेही दखल घेतलेली नाही. हे सरकार बेटी पढाव, बेटी बचाव असा नारा देत आले आहे. हाच काय तो बेटीचा बचाव, असा खोचक सवाल शिरोडकर यांनी केला आहे.