‘सेवा व समर्पण मोहिमे’च्या अंतर्गत आयोजन, विविध विभागांतील तज्ञ डॉक्टरांचा सहभाग
प्रतिनिधी /फातोर्डा
कोविड महामारीनंतर लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत सेवा आणि समर्पण ही मोहीम हाती घेण्यात आली असून त्याच्या अंतर्गत देशभरात आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, असे एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी कोंब येथील विद्याभुवनमध्ये बोलताना सांगितले.
भाजप मडगाव मंडळातर्फे या मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबिरासाठी पुढाकार घेतलेले मंडळाचे सचिव पराग रायकर, युवा मोर्चाचे सरचिटणीस दिपांकर नाईक तसेच शर्मद रायतूरकर, रंजिता पै, नगरसेविका रोनिता आजगावकर? आणि डॉ. यश वेरेकर, डॉ. गौरव नार्वेकर, डॉ. विजेता जांबावलीकर नाईक, डॉ. कार्ला फालेरो व इतर हजर होते. या शिबिराचा लाभ अनेक जणांनी घेतला.
नकारात्मक विचार काढून टाका
यावेळी बोलताना फिजिशियन डॉ. वेरेकर म्हणाले की, पौष्टिक व संतुलित आहार घ्यावा. दररोज कमीत कमी अर्धा तास आणि आठवडय़ातून किमान पाच दिवस तरी व्यायाम करावा. मानसिक आरोग्य ठीक ठेवण्यासाठी नकारात्मक विचार काढून टाकावेत व सकारात्मक विचार करावा. कान, नाक व घसातज्ञ डॉ. जांबावलीकर नाईक म्हणाल्या की, घसा ठीक ठेवण्यासाठी पाणी भरपूर प्यावे. तिखट, तेलकट खाऊ नये. धुम्रपान करणाऱयांना वा इतरांना जर घशाचा कसलाही त्रास दहा दिवसांपेक्षा जास्त काळ होत असेल, तर त्वरित डॉक्टराचा सल्ला घ्यावा. वयोमानाप्रमाणे कमी ऐकू येते. अशा वेळी ऐकण्याचे यंत्र लावणे चुकीचे आहे. जर काहीच ऐकू येत नसेल, तर यंत्राचा वापर करावा. कानात तेल घातल्याने बुरशीजन्य संसर्ग होतो. सायनसचा त्रास असलेल्यांनी धुळीपासून दूर रहावे, असे त्यांनी सांगितले.
त्वचारोगतज्ञ डॉ. फालेरो यांनी सांगितले की, जास्त वेळ उन्हात राहिल्याने चेहऱयावर काळे डाग पडतात. त्यामुळे बाहेर जाताना उन्हापासून संरक्षणासाठी विशेष क्रिमचा वापर करावा. चेहरा साबणाने न धुता फेसवॉशने धुवावा. चेहऱयावर खोबरेल तेल लावणे चुकीचे आहे, असे त्यांनी सांगितले. दंतचिकित्सक डॉ. नार्वेकर यांनी सांगितले की, दिवसातून किमान दोनदा दात घासणे आवश्यक आहे. पूर्वी दात फिलिंग करणे, रूट कॅनल करणे अशी उपचार पद्धत नव्हती. त्यामुळे दात दुखायला लागला की, काढून टाकावा लागायचा. दात पडला की, त्याचा परिणाम बाजूच्या दातांवर होतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. स्त्रीरोगतज्ञ डॉ. नीरज बोरकर म्हणाले की, महिलांनी गर्भाशयाचा कर्करोग टाळण्यासाठी प्रत्येक तीन वर्षांनी चाचणी करून घेणे गरजेचे आहे. तसेच महिलांना रजोनिवृत्तीच्या काळात हृदयविकाराचा धोका जास्त असतो. त्यामुळे या काळात व्यायाम करणे आवश्यक आहे, असा सल्ला त्यांनी दिला.
बदलत्या राजकीय परिस्थितीचा भाजपवर परिणाम होणार नाही : सावईकर
मागील पाच ते सहा महिन्यांत अनेक पक्ष गोव्यात दाखल झाले असून सरकार स्थापनेचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. पण गोवेकर सूज्ञ आहेत. ते कुठल्याही खोटय़ा आश्वासनांना फसणार नाहीत. हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. भाजप फक्त निवडणुकीच्या वेळीच नव्हे, तर वर्षभर कार्यरत असतो. त्यामुळे कुणीही कुठल्याही पक्षात प्रवेश घेतला, तरी या बदलत्या राजकीय परिस्थितीचा भाजपवर कुठलाही परिणाम होणार नाही, असे सावईकर यावेळी बोलताना म्हणाले.