प्रतिनिधी /मडगाव
कोरोनामुळे मडगाव शहरात आतापर्यंत दोघा भिकाऱयांचा बळी गेला आहे. त्यामुळे शहरातील भिकाऱयांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. या भिकाऱयांना ताब्यात घेऊन त्यांना सरकारने निवारा केंद्रात ठेवावे व त्यांच्यापासून मडगावातील लोकांची सुटका करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शहरात यापूर्वी भिकारी व बेवारस असलेल्यांना मृत्यू आलेला आहे. पण, त्यावेळी त्यांच्याकडे कुणीच गांभीर्याने पाहिले नव्हते. बऱयाचवेळा मृतदेह सडून दुर्गंधी सुटण्याचे प्रकारही घडलेले आहेत. पोलिसांना हे भिकारी किंवा बेवारसांना मृत्यू आल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस येऊन मृतदेह घेऊन जायचे. त्याच्यामुळे हॉस्पिसियो इस्पितळाचे शवागर देखील भरून राहायचे. मडगावच्या स्टेशन रोड, गांधी मार्केट, सिने लता परिसरात भिकारी तसेच बेवारसांचे मृतदेह आढळून येण्याचे प्रमाण जास्त असते.
मात्र, आता कोरोनामुळे भिकाऱयांचा बळी जाऊ लागल्याने, त्याची दखल घेण्याची पाळी सर्वांवरच आलेली आहे. एखाद्या मृतदेह हॉस्पिसियो इस्पितळात आणला गेला तर त्याची अगोदर स्वॅब चाचणी घेतली जाते. जर मयत व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असेल तर तिची शवचिकित्सा न करता शवविच्छेदन केले जाते. गेल्या दोन दिवसामागे आणखीन एका भिकाऱयाला मृत्यू आला असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे. त्यालासुद्धा कोरोनाचीच लक्षणे होती, अशी माहिती प्राप्त झालेली आहे.
निवारा केंद्रात व्यवस्था करावी : कामत
मडगाव शहरात कोविडमुळे आतापर्यंत दोन भिकारी मरण पावल्यानंतर अशा भिकारी व बेघरांपासून कोविडचा फैलाव होऊ शकतो त्यामुळे संपूर्ण गोव्यातील लोकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले असून गोव्यातील अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला, सार्वजनिक जागा तसेच खुल्या मैदानावर निवारा घेणारे बेघर व भिकारी यांना सरकारने त्वरित ताब्यात घेऊन त्याना निवारा केंद्रात न्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते तथा मडगावचे दिगंबर कामत यानी केली आहे.
मडगावातील समस्येबद्दल दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयांकडे आपण काल बैठक घेऊन या बेघर व भिकाऱयांना त्वरित निवारा केंद्रात नेण्याचा मागणी केली आहे. गोव्यातील अनेक भागातील लोकांनी आपल्याशी संपर्क साधून राज्यात अनेक शहरात ही समस्या असल्याचे सांगितले व खास करुन ट्रफीक सिग्नलवर असे लोक मोठय़ा संख्येने जमतात असे लक्षात आणून दिले, असा दावा दिगंबर कामत यांनी केला आहे.
दक्षिण गोवा जिल्हा प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांकडे आपण बोलणी केली असून एसजीपीडीए मैदानावर उभारण्यात आलेले बेकायदा निवारे त्वरित हटवावे असे त्यांना सांगितले आहे. सरकारने या सर्व लोकांना निवारा केंद्रात नेल्यानंतर त्याना त्यांच्या मूळ गावात पाठविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही दिगंबर कामत यानी केली आहे.
मुख्य सचिव घेणार निर्णय
दरम्यान, काल दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस अधिकारी व जिल्हाधिकाऱयांची बैठक झाली. त्या बैठकीत भिकारी तसेच बेघर राहणाऱया लोकांवर कारवाई करण्याविषयी चर्चा झाली. हा विषय राज्याच्या मुख्य सचिवापर्यंत नेण्यात येणार आहे व मुख्यसचिव या प्रकरणी निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनीसुद्धा यापूर्वी हा विषय मुख्य सचिवांकडे नेला होता.
सरकारच्या अधिकृत माहितीत कोरोनाचे 29 बळी दर्शवित असले तरी गेल्या सोमवारी मडगाव शहरात मृत्यू आलेल्या भिकाऱयांची कोरोना पॉझिटिव्ह म्हणून नोंद सरकारदरबारी नोंद झालेली नाही. या भिकाऱयाला सोमवारी मृत्यू आला होता तर त्याची स्वॅब चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले होते.