शिवरायांचा पुतळा उभारण्याची मागणी
प्रतिनिधी/ संकेश्वर
मणगुत्ती (ता. हुक्केरी) येथील छ. शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा प्रशासनाकडून काढून ठेवण्यात आला. पंधरा दिवसात पुन्हा पुतळा बसविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्यापही प्रशासनाने याबाबत कोणतीच हालचाल न केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने मोर्चा काढून शिवरायांचा पुतळा त्वरित बसविण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार अशोक गुराणी यांना दिले.
मंगळवारी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्यावतीने महाराष्ट्रातील कवळीकट्टी येथून मणगुत्तीच्या दिशेने मोर्चा काढण्यात आला. त्यांना कर्नाटकात प्रवेश करण्यापासून पोलिसांनी रोखले. यावेळी हुक्केरीचे तहसीलदार अशोक गुराणी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. शिवसैनिकांनी पुतळा अद्याप का बसविला नाही असे तहसीलदारांना विचारले असता, वरिष्ठांकडून अद्याप तसे आदेश आले नसून, परवान्याची प्रक्रियादेखील पूर्ण न झाल्याने विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रशासनाने दिलेला शब्द पाळत त्वरित पुतळय़ाची प्रतिष्ठापना करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱयांच्या नावे तहसीलदारांना देण्यात आले.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे, उपप्रमुख संजय पवार, आर्थिक विकास महामंडळ उपाध्यक्ष आण्णासाहेब पाटील, प्रा. सुनील शिंत्रे, संग्राम कुपेकर, दिलीप माने, भिकाजी हळदकर, उत्तम पाटील, राजेंद्र पाटील, भरत जाधव, मंजीत पाटील, प्रतिक क्षीरसागर, दिनेश कुंभीकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते..