प्रतिनिधी / शिराळा
शिराळा तालुक्यातील मणदूर धनगर वाडा, विनोबाग्राम, खुदलापूर या गावातील जमिनीची फाळणी करून विभक्त सात बारा करून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी दिली. येथील ग्रामस्थांनी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची भेट घेऊन विभक्त सात बारा करणे आणि पुनर्वसन बाबत असणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा केली. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी बोलताना शिवाजीराव नाईक म्हणाले, सातारा जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी सातारा यांनी सात बारावर येथील संबंधित खातेदार यांचे नाव नोंद केले होते. परंतु त्यामध्ये पूर्वीचे असणारे वन विभागाचे नाव त्यातून कमी झाले नाही. त्यामुळे सदरच्या 7/12 उताऱ्यावर त्या खातेदारा बरोबर वन विभागाचे देखील नाव लागलेले आहे. त्यामुळे या गावांना शासनाच्या कोणत्याही योजनेचा अगर सार्वजनिक विकासकामांचा लाभ मिळत नाही. या गावांना पिण्याच्या पाण्याची योजना, स्मशानभूमी, गावातील अंतर्गत रस्ते, विंधन विहीर, सामाजिक सभागृह, शालेय इमारती, अशा गोष्टींपासून अलिप्त राहावे लागले आहे. याला एकमेव कारण त्यांच्या 7/12 वरती येणारे वन विभागाचे नाव आहे.
स्वातंत्र्य लढ्यापासून या गावातील प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत. याबाबत मी लोकप्रतिनिधी असताना सातत्याने शासनाकडे व सभागृहांमध्ये हा प्रश्न उपस्थित केला होते. शासना चे वरिष्ठ अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या परिस्थितीची माहिती घेतलेली आहे. सद्यस्थितीला या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष झालेले असून गेल्या वर्ष-दीड वर्षाच्या काळामध्ये हे या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असून याबाबत शासन दरबारी या लोकांची मागणी लावून धरणार आहे. जर शासनाने हा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही, तर ग्रामस्थांना संघटीत करून व्यापक आंदोलन उभा करणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.