हिंगांग मतदारसंघाचे उमेदवार असणार मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह
भाजपने आगामी मणिपूर विधानसभा निवडणुकीत सर्व 60 जागांवर निवडणूक लढविण्याची घोषणा केली ओ. मुख्यमंत्री इन. बिरेन सिंह हे हिंगांग मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. पक्षाने सर्व मतदारसंघांमधील उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. राज्यात दोन टप्प्यांमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च रोजी मतदान होणार आहे.
राज्यात भाजप दोन तृतीयांश बहुमतासह सरकार स्थापन करणार आहे. भाजपमध्ये दीर्घकाळ काम केलेल्यांना उमेदवारीत प्राधान्य मिळाले आहे. उमेदवारांमध्ये क्रीडापटू, प्रशासकीय आणि शैक्षणिक जगताशी संबंधित लोक सामील असल्याचे विधान केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री तसेच मणिपूरचे पक्ष प्रभारी भूपेंद्र यादव यांनी केले आहे.
मणिपूरमध्ये अफ्स्पा हटविण्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राज्याचे लोक तसेच आपण देखील सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा हटविण्यात यावा या मताचा आहे, परंतु असे केवळ केंद्राच्या सहमतीनेच केले जावे, कारण राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे म्हटले होते.
मागील विधानसभा निवडणुकीत 28 आमदार निवडून येऊन देखील काँग्रेसला राज्यात सत्ता मिळविता आली नव्हती. तर केवळ 21 आमदार असलेल्या भाजपने दोन स्थानिक पक्ष, एनपीपी आणि एनपीएफच्या सहकार्याने 2017 मध्ये मणिपूरमध्ये सरकार स्थापन केले होते.
मुलायम यांची धाकटी सून देणार अखिलेश यांना टक्कर
भाजपकडून करहल मतदारसंघाची उमेदवारी शक्य
देशातील सर्वात मोठे राजकीय घराणे आणि मुलायम सिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा यांच्या एका वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. अपर्णा यादव यांना लखनौ कँट मतदारसंघाच्या दावेदार मानले जात होते, परंतु आता त्यांनी भाजपने करहल मतदारसंघाची उमेदवारी दिली तरी तेथूनही निवडणूक लढण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. करहल मतदारसंघात मुलायम सिंह यादवांचे पुत्र आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव उभे राहिले आहेत.
अपर्णा यादव यांनी 19 जानेवारी रोजी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना दिल्लीच्या पक्ष मुख्यालयात उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांनी पक्षाचे सदस्यत्व दिले होते. लखनौ कँट मतदारसंघाची उमेदवारी नाकारल्याने त्या अखिलेश यादव यांच्यावर नाराज होत्या असे सांगण्यात येते.
करहलमध्ये सपचा दबदबा
करहल मतदारसंघात 1989 पासून समाजवादी पक्षाचा दबदबा राहिला आहे. 2017 मध्ये देखील या मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार सोवरन सिंह यादव यांचा विजय झाला होता. करहल हा यादवबहुल मतदारसंघ आहे. या मतदारसंघात भाजप केवळ एकदा 2002 साली विजय मिळविण्यास यशस्वी ठरला होता.
विधानपरिषदेवर पाठविण्याची तयारी
अपर्णा यादव यांनी 2017 च्या निवडणुकीत सप-काँग्रेस आघाडीच्या वतीने लखनौ कँट मतदारसंघातून निवडणूक लढविली होती, परंतु त्या भाजप उमेदवार रीता बहुगुणा जोशी यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या. 2017 पासून आतापर्यंत त्या कँट भागात सक्रीय आहेत. तेथील कार्यक्रमांमध्ये त्या सामील होतात, अशा स्थितीत त्यांचा प्रबळ दावा पॅँट मतदारसंघच असल्याचे मानले जातेय. परंतु कँट मतदारसंघावर भाजपच्या दिग्गजांची नजर आहे. अशा स्थितीत भाजप अपर्णा यांना निवडणुकीत थेट न उतरविता विधान परिषदेवर पाठविणार असल्याचेही मानण्यात येत आहे.
रोखठोक व्यक्तिमत्त्व
समाजवादी पक्षात असतानाही अपर्णा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथा यांच्या कामकाजाचे कौतुक केले होते. कान्हा उपवनात त्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत दिसून आल्या होत्या. यादव कुटुंबात कलह निर्माण झाला असता त्या शिवपाल यादव यांच्या बाजूने उभ्या राहिलेल्या दिसून आल्या. अपर्णा या स्वतःचे निर्णय स्वतःच घेतात आणि आता त्या भाजपमध्ये सामील झाल्या आहेत. अपर्णा यांच्या या प्रवेशाचा लाभ भाजप घेणार असल्याचे मानले जात आहे.