ईशान्य भारतातील मणिपूर राज्यातही विधानसभा निवडणूक होत असून तेथे आज शनिवारी दुसऱया आणि अंतिम टप्प्याचे मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात 38 मतदारसंघांमध्ये 80 हून अधिक टक्के मतदान झालेले आहे. आता दुसऱया आणि अखेरच्या टप्प्यात उर्वरित 22 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.
मणिपूरमध्ये सध्या भाजपचे राज्य आहे. त्यामुळे हे राज्य टिकविण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. येथे काँग्रेस पक्षानेही जोर लावला असून खरी चुरस भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यातच आहे, असे तज्ञांचे मत आहे. काही प्रादेशिक पक्षही त्यांच्या त्यांच्या भागांमध्ये प्रबळ मानले जातात. तथापि बहुमताची संधी भाजप किंवा काँग्रेस या दोन पैकी एका पक्षाला मिळेल, असे प्रथमदर्शनी वाटत आहे. मात्र त्रिशंकू विधानसभा निर्माण झाल्यास प्रादेशिक पक्षांना महत्त्व प्राप्त होणार असून राज्यात युतीचे सरकार येऊ शकते असाही विचार प्रवाह आहे.
वनवासींचा भाजपला पाठिंबा
मणिपूरमधील काही वनवासी जमातींनी भाजपला पाठिंबा घोषित केला आहे. तर काही समाज घटकांनी काँग्रेसलाही पाठिंबा दिला आहे. 2014 पासून या राज्यात भाजपचा प्रभाव वाढला असून काँग्रेस काहीशी पिछाडीवर पडल्याचे दिसून येते. तथापि यावेळी दोन्ही पक्षांमध्ये जवळपास समान चुरस दिसून येत आहे.