काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कोंथौजम यांनी दिला राजीनामा – पक्षाचे 8 आमदार भाजपच्या वाटेवर
वृत्तसंस्था / इम्फाळ
ईशान्येतील राज्य असलेल्या मणिपूरमधील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंददास कोंथौजम यांनी मंगळवारी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला आहे. कोंथौजम यांच्यासह काँग्रेसच्या किमान 7 आमदार भाजपमध्ये सामील होणार असल्याचे मानले जात आहे. कोंथौजम हे राज्यातील विष्णूपूर मतदारसंघाचे आमदार आहेत.
60 सदस्यीय विधानसभेत रालोआ सरकारकडे 36 आमदारांचे बळ आहे. आघाडीत भाजपचे 24 तर नॅशनल पीपल्स पार्टीचे 4, नागा पीपल्स प्रंटचे 4 आणि लोकजनशक्ती पक्षाचा एक आणि 3 अपक्ष आमदार सामील आहेत. विरोधी गटात काँग्रेसचे 17 तर तृणमूलचा एक आमदार आहे. तर 6 जागा रिक्त आहेत.
काँग्रेसच्या 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर भाजपचे संख्याबळ 44 वर पोहोचणार आहे. तर काँग्रेसमध्ये केवळ 9 आमदार राहतील. 2017 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पासूनच मणिपूर सरकारवर संकटाचे ढग घोंगावत होते. निवडणुकीत भाजपने 21 तर काँग्रेसने 28 जागा जिंकल्या होत्या. सरकार स्थापन करण्यासाठी 31 जणांचा पाठिंबा आवश्यक होता. अशा स्थितीत भाजपने आघाडीचे सरकार स्थापन केले होते.
मागील वर्षी जून महिन्यात मणिपूरमध्ये मुख्यमंत्री एन. विरेन सिंग यांच्या सरकारचा 9 आमदारांनी पाठिंबा काढून घेतला होता. यात भाजपचे 3, नॅशनल पीपल्स पार्टीचे 4 आणि दोन अपक्ष आमदार सामील होते. भाजप आमदार काँग्रेसमध्ये सामील झाल्याचे बोले जात होते. या आमदारांमुळे काँग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ 31 वर पोहोचणार होते. पण काही दिवसांनी एनपीपीचे चारही आमदार पुन्हा सरकारच्या पाठिशी उभे राहिल्याने रालोआची सत्ता टिकली होती.