शांत बसणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे विधान
वृत्तसंस्था/ इम्फाळ
मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर हिंसक घटना घडल्या आहेत. राज्याच्या पश्चिम इम्फाळ जिल्हय़ात इंडियन रिझर्व्ह बटालियन (आयआरबी)च्या एका जवानासह दोन जणांची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये भाजप कार्यकर्त्याचा समावेश आहे. या घटनेनंतर संबंधित भागात तणावाचे वातावरण आहे. वांगोई पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱया सामुरोउ येथे ही घटना घडली आहे.
अबुजाम जॉन (50 वर्षे) आणि आयआरबी जवान अबुजाम शशिकांता (34 वर्षे) स्वतःच्या घरानजीक असताना गुंडांनी त्यांच्यावर गोळय़ा झाडल्या होत्या. हल्लेखोरांची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. जॉन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर आयआरबी जवानाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
अबुजाम जॉन हे भाजपचे सदस्य होते आणि कृषिमंत्री ओ लुखोई यांच्यासाठी काम करायचे. शशिकांता हे देखील भाजप समर्थक होते आणि परिसरात पक्षासाठी काम करत होते. मुख्यमंत्री एन. विरेन सिंह यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.
हा भाजप समर्थकांवरील हल्ला होता आणि गुन्हेगारांना अटक होईपर्यंत सरकार शांत बसणार नाही. पोलीस या हत्यांची चौकशी करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हत्येच्या घटनांमुळे नाराज स्थानिक लोकांनी राजधानी इम्फाळला जोडणाऱया रस्त्यावरील वाहतूक रोखली होती.