वृत्तसंस्था/ इम्फाळ :
मणिपूरमध्ये राजकीय संकट गडद झाल्यानंतर काँग्रेसने सत्तास्थापनेचे प्रयत्न गतिमान केले आहेत. मणिपूरमध्ये आघाडी सरकार स्थापन करणार असल्याचे विधिमंडळातील काँग्रेसचे गटनेते ओ इबोबी सिंग यांनी म्हटले आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार असल्याचे इबोबी यांनी सांगितले आहे.
विधानसभा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणारे भाजपचे तिन्ही आमदार काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमधून राजीनामा देणाऱया नॅशनल पीपल्स पार्टीच्या सर्व चारही मंत्र्यांनी चर्चेसाठी संपर्क साधला आहे. मुख्यमंत्री एन. विरेन सिंग यांच्या सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार आहे. विधानसभेचे विशेष अधिवेशन लवकरात लवकर बोलाविण्याची मागणी करणार असल्याचे इबोबी म्हणाले. उपमुख्यमंत्री वाई जॉयकुमार सिंग, आदिवासी तसेच पर्वतीय क्षेत्र विकासमंत्री एन. कायिशी, क्रीडामंत्री लेतपाओ हाओकिप आणि आरोग्यमंत्री एल. जयंतकुमार सिंग यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.