वृत्तसंस्था / इम्फाळ :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मणिपूर जलपुरवठा प्रकल्पाच्या कामाचा गुरुवारी शुभारंभ केला आहे. कोरोनाच्या विरोधात आम्हाला दृढपणे लढत रहायचे असून ते जिंकायचे देखील आहे. याचबरोबर विकासकामांना पूर्ण शक्तिनिशी चालना देणे अपेक्षित आहे. ईशान्येत आता शांतता प्रस्थापित होत आहे. ईशान्येमध्ये शांतता, प्रगती आणि समृद्धीचा मंत्र जोर पकडू लागल्याचे मोदी म्हणाले.
पूर्व आणि ईशान्य भारताला दुहेरी आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान होत असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. केंद्र सरकार सर्व राज्यांसोबत मिळून गरजा पूर्ण करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. मणिपूरमध्ये कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकार झटत आहे. टाळेबंदीत लोकांना परत आणण्यासह राज्य सरकारने आवश्यक पावले उचलली असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
मणिपूरच्या लाखो सहकाऱयांसाठी विशेषकरून बहिणींसाठी आजचा दिवस अत्यंत मोठा आहे. राखीचा सण येण्यापूर्वी मणिपूरच्या बहिणींसाठी ही अत्यंत मोठी भेट ठरेल. 3 हजार कोटी रुपयांच्या निधीद्वारे पूर्ण होणाऱया जलपुरवठा प्रकल्पामुळे पेयजलची समस्या कमी होणार आहे. 1700 पेक्षा अधिक गावांसाठी या प्रकल्पातून जलधारा (जलप्रवाह) निघणार असून ती जीवनधारेचे (जीवनप्रवाह) काम करणार आहे. हा प्रकल्प आगामी 20-22 वर्षांच्या गरजा लक्षात घेत तयार करण्यात आला असून याचे काम टाळेबंदीतही थांबले नसल्याचे मोदी म्हणाले.
पूर्व आशियाचे प्रवेशद्वार
उत्तम जीवनाचा थेट संबंध संपर्कव्यवस्थेशी आहे. ईशान्येची संपर्कव्यवस्था येथील लोकांच्या ईज ऑफ लिव्हिंगसाठी आवश्यक आहे. पूर्व आशियासोबत सांस्कृतिक संबंधांचा ईशान्य भारत हे प्रवेशद्वार आहे. 6 वर्षांमध्ये पूर्ण ईशान्य भागाच्या पायाभूत विकासाकरता हजारो कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. ईशान्येतील राज्यांच्या राजधान्यांना चारपदरी आणि गावांना प्रमुख रस्त्यांनी जोडण्याचा प्रयत्न असून याकरता सुमारे 3 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते तयार झाले आहेत. 7 हजार किमी लांबीच्या मार्ग प्रकल्पांवर वेगाने काम सुरू आहे. रेल्वे संपर्कव्यवस्थेतही मोठा बदल दिसून येत असल्याचे मोदी म्हणाले.
पर्यटनालाही लाभ
ईशान्य भागात सद्यकाळात सुमारे 13 विमानतळे कार्यान्वित आहेत. ईशान्येसाठी आणखी एक मोठे काम होत आहे. इन-लँड-वॉटरवेजच्या क्षेत्रात मोठा बदल दिसून येत आहे. भविष्यात येथील संपर्कयंत्रणा केवळ सिलीगुडी कॉरिडॉरपुरती मर्यादित राहणार नाही. सीमलेस कनेक्टिव्हिटीवर काम होत आहे. ईशान्य देशाच्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वैविध्याचे अत्यंत मोठे प्रतीक आहे. आधुनिक पायाभूत सुविधांमुळे येथील पर्यटनालाही मोठा लाभ होणार असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.