वार्ताहर /हिंडलगा
संततधार पावसामुळे मार्कंडेय नदीला आलेल्या पुराने बेळगावपासून मण्णूर व आंबेवाडी गावाला जोडणाऱया रस्त्यांचे व नदीकाठच्या शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याने माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवार दि. 19 रोजी पाहणी करून रस्त्यांच्या दुरुस्तीबरोबरच शेतकऱयांना नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
सलग तीन वर्षांपासून पावसामुळे मण्णूर आणि आंबेवाडी गावच्या रस्त्यांचे व नदीकाठच्या शेतकऱयांचे नुकसान होत आहे. तरीदेखील शासनाकडून शेतकऱयांना नुकसानभरपाई मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यातच मागील आठवडय़ात झालेल्या संततधार पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे. रस्ते पूर्णतः उखडून गेल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. दोन्ही बाजूला सहा ते सात फूट खोल खड्डा पडल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याबाबत ‘तरुण भारत’मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची दखल आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेत माजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंगळवारी पाहणी करून रस्ता दुरुस्तीला तातडीने सुरुवात करण्यासह शेतकऱयांना योग्य नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आमदार सतीश जारकीहोळी, वीरकुमार पाटील, लक्ष्मणराव चिंगळी, मृणाल हेब्बाळकर यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते, कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.