संतप्त ग्रामस्थांकडून कंत्राटदार धारेवर : जमीन गावासाठी जतन करणार
वार्ताहर /हिंडलगा
मण्णूर येथील डाएट महाविद्यालयाच्या बाजूला असलेल्या गायरान जागेत पुन्हा शासकीय इमारतीचे बांधकाम सुरू करण्याच्या हालचाली दिसून आल्याने सोमवार दि. 22 रोजी ग्रामपंचायत सदस्य, देवस्की पंच कमिटी सदस्य व ग्रामस्थांनी संबंधित कंत्राटदाराला जाब विचारत काम त्वरित बंद करण्याची मागणी केली.
ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार मण्णूर गावच्या टेकडीवर डाएट महाविद्यालयाच्या बाजूलाच असलेल्या गायरान जागेत ग्रामस्थांना कोणतीच कल्पना न देता सरकारी कार्यालयासाठी इमारत बांधकाम करण्यासाठी जमिनीचे सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. सुरुवातीला टेकडीवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू असेल या अंदाजाने ग्रामस्थांनी दुर्लक्ष केले होते. पण या ठिकाणी खडी व इतर साहित्य आणून टाकत असल्याने इमारत बांधकाम होण्याची शक्मयता वर्तविण्यात आल्याने गावातील सदस्य व ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेऊन सोमवारी काम सुरू असलेल्या ठिकाणी धाव घेत संबंधित कंत्राटदाराकडे चौकशी केली. यावेळी सरकारी कार्यालयासाठी इमारतीचे बांधकाम सुरू होणार असल्याची माहिती कंत्राटदाराने दिली. त्यामुळे संतप्त सदस्यांनी कंत्राटदाराशी हुज्जत घालून त्वरित काम बंद करण्याची मागणी केली. ग्रामस्थांच्या परवानगीशिवाय कोणतेही बांधकाम सुरू करू नका, अशी ताकीद देण्यात आली. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी संबंधित कंत्राटदाराने आपल्या वरि÷ांशी संपर्क साधून ग्रामस्थांचा कामाला विरोध असल्याची माहिती दिली. त्यानंतर सदर कंत्राटदाराला ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे लवकरच यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य मधुकर चौगुले, दत्तू चौगुले, रामा चौगुले, जोतिबा शहापूरकर, देवस्की पंच कमिटी अध्यक्ष मुकुंद तरळे यांच्यासह सदस्य व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
डाएट इमारती बनल्या जुगारी अड्डा
गावातील जनावरांसाठी राखीव ठेवलेली जमीन संपादित करून सरकारी डाएट महाविद्यालयासाठी टेकडीवर कोटय़वधी रुपये खर्च करून इमारती उभारल्या आहेत. यामध्ये डाएटचे जिल्हा मुख्य कार्यालय, महाविद्यालय, वसतिगृह आदी इमारतींचा समावेश आहे. सध्या मुख्य कार्यालय वगळता इतर इमारती वापराविना धूळखात पडून आहेत. परिणामी गावातील तसेच आंबेवाडी व परिसरातील युवक यांचा वापर जुगार खेळणे व दारू पिण्यासाठी करत आहेत. याबाबत माहिती असूनही प्रशासन कोणतीच कारवाई करत नाही. कोटय़वधी रुपये खर्च करून पुन्हा इमारत बांधण्यापेक्षा इमारती दुरुस्त करून त्यांचा वापर करावा. उर्वरित जमीन गावातील जनावरांसाठी राखीव ठेवण्याची मागणी केली जात आहे.