उपनगरी भागात 40 ते 45 टक्के मतदान, कोरोनाची धास्ती-श्रावण शुक्रवारमुळे मतदानास थंडा प्रतिसाद
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची संख्या भरपूर होती. पण मतदानासाठी मतदार नव्हते. त्यामुळे मतदानाचा टक्का घटला असून टिळकवाडी, अनगोळसह हनुमाननगर, महांतेशनगर अशा उपनगरीय भागातील मतदानाची टक्केवारी खूपच कमी झाली आहे. याला अनेक कारणे असू शकतात. यामध्ये मुख्यतः परगावी गेलेल्या मतदारांना केवळ मतदानासाठी येण्याकरिता आरटीपीसीआर करणे बंधनकारक होते. तसेच अन्य कारणे देखील असण्याची शक्मयता आहे.
या निवडणुकीत अपेक्षेइतके मतदान झाले नाही. कदाचित कोरोनाची भीती जनसामान्यांमध्ये अधिक आहे. थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझिंग सेवा असूनही लोक बहुसंख्येने मतदानासाठी बाहेर पडले नाहीत. त्यामुळे कोरोनाचे सावट त्यांना भेडसावत असावे, असा अंदाज काढण्यास वाव आहे. शहरातील बहुतांश नागरिक नोकरी, व्यवसायामुळे परगावी, परराज्यात राहतात. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रसार वाढल्याने बेळगावमध्ये येण्यासाठी कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक आहे. बरेचसे मतदार बाहेर गेले आहेत. परत येण्यासाठी आरटीपीसीआर सक्तीची असल्याने त्यांनी मतदानास येणे टाळले असावे, अशी शंका व्यक्त होत आहे.
श्रावणातील शेवटचा शुक्रवार असल्याने महिलावर्ग पूजेमध्ये गर्क राहिला. महिलांनी मतदान केले असले तरी तुलनेने त्यांची संख्या कमी आहे. काही महिलांनी पहाटे लवकर तर काही महिलांनी दुपारनंतर मतदान केले. हे खरे असले तरी बहुसंख्य महिलांना पूजा आणि सायंकाळच्या हळदी-कुंकवाची तजवीज करणे महत्त्वाचे वाटले. दरम्यान पावसाने मात्र मतदारांवर मेहरबानी केली आणि कोणताही व्यत्यय न आणता मतदान पार पडले. प्रचारावेळी काही सर्रास उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. पण अपार्टमेंटमधील बहुतांश फ्लॅटना टाळे होते. बेळगावमधील असंख्य लोक बेंगळूर, मंगळूर, पुणे, मुंबई अशा भागात नोकरीनिमित्त असतात. अपार्टमेंटमध्ये राहणाऱया नागरिकांचे रहिवासी दाखले बेळगावचे असले तरी ते बेळगावमध्ये वास्तव्यास नसतात. त्यामुळे ते नागरिक मतदानासाठी आले नसल्याने टक्केवारी घटल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.