नवी दिल्ली / वृत्तसंस्था
चार राज्ये, एक केंद्रशासित प्रदेश आणि इतर पोटनिवडणुका यांच्या मतदानाच्या दिवसाआधी 72 तास कोणालाही बाईकरॅली काढता येणार नाही, असा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने काढला आहे.
मोठय़ा बाईक रॅलींच्या माध्यमातून मतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, अशा तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारे सर्वसामान्य मतदारावर दबाव टाकण्याची संधी राजकीय पक्ष किंवा त्यांच्या संघटनांना मिळू देण्यास आयोग तयार नाही. म्हणून कोणत्याही मतदारसंघातील मतदानाच्या दिवसापूर्वी 72 तास अशा मिरवणुका काढता येणार नाहीत. या 72 तासांच्या कालावधीत अशा बाईक मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे असा स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाने राज्य सरकारांना व स्थानिक पोलीस व प्रशासकीय अधिकाऱयांना कळविला आहे.