प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील अनेक भागात पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला असून मतदारसंघनिहाय पाणी प्रश्न उपाययोजना यावर आराखडा (प्लॅन) सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत.
उपरोक्त खात्याची डॉ. सावंत यांनी उच्चस्तरीय समितीची बैठक घेऊन राज्यातील पाणी प्रश्नावर चर्चा केली आणि पाणी टंचाईची समस्या 15 जानेवारीपर्यंत निकालात काढण्याची सूचना त्यांनी खात्याला केली आहे. अभियत्यांनी आठ दिवसात उपाययोजनेचा आराखडा सादर करावा, असेही बाजावले आहे.
काही सरकारी कर्मचारी – अधिकारी योग्य प्रकारे काम करीत नाहीत तर काही अभियंते चुकीची माहिती देतात, असे डॉ. सावंत यांनी निदर्शनास आणले आणि त्याबाबत योग्य ती कारवाई करण्याचा इशारा दिला.
सरकारच्या विविध खात्यांच्या कंत्राटदारांची 31 मार्च 2020 पर्यंतची एकूण रु. 500 कोटींची बिले फेडण्यात आली असून त्यासाठी महाराष्ट्र बँकेने तेवढय़ाच रक्कमेचे अर्थसाहाय्य केले आहे. आगामी 6 महिन्यानंतर ती रक्कम सदर बँकेला परत करण्यात येणार आहे. आरएक्सएस या नवीन पद्धतीने ती बिले फेडली असून गोवा हे देशातील या पद्धतीने बिले देणारे पहिले राज्य ठरल्याचे ते म्हणाले.
दहावी, बारावी, कॉलेज अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑफलाईन
दहावी – बारावी बोर्ड परीक्षा तसेच कॉलेज अंतिम वर्षाच्या परीक्षाही ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती मुख्य़मंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. बोर्डाने तसेच गोवा विद्यापीठाने तसा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वरील सर्व परीक्षा महत्त्वाच्या असल्याने त्या ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. मागील मे महिन्यातही अशाच प्रकारे दहावी – बारावी परीक्षा यशस्वीपणे घेण्यात आल्या होत्या. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.