मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
प्रतिनिधी/कोल्हापूर
लोकसंख्येच्या तुलनेत मतदार यादीत युवकांचे प्रमाण कमी आहे. ही चिंतेची बाब आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग आवश्यक असून अधिकाधिक युवकांनी मतदार नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधकारी श्रीकांत देशपांडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्रीक्षण कार्यक्रमांतर्गत आयोजित आढावा बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव आदी उपस्थित होते.
मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे म्हणाले, 18 वर्षे पूर्ण झालेल्या युवकांच्या साडेतीन टक्के लोकसंख्येच्या तुलनेत मतदार यादीतील प्रमाण हे सव्वा टक्के आहे. तर 19 ते 29 वयोगटातील 18 टक्के लोकसंख्या असलेल्या युवकांचे प्रमाण मतदार यादीतील प्रमाण हे 13 टक्के आहे. एकंदरीत मतदार यादीतील युवकांचे कमी प्रमाण हे चिंतनीय आहे. निवडणूक आयोगातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही मतदार यादी विशेष पुनर्रिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मतदारांनी मतदार यादीत आपले नाव असल्याचे तपासून घ्यावे. मतदार यादीत नाव नसल्यास तसेच 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर 18 वर्षे पूर्ण होणाया सर्व नागरिकांनी मतदार नोंदणी करून घ्यावी. नव विवाहित महिलांचा नावात बदल, दुबार नावे व मयत असल्यास नाव वगळण्याची प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी, जेणेकरुन मतदार यादी निर्दोष व अद्ययावत तयार होईल. या यादीत नाव असणार्यांनाच येणाऱ्या लोकसभा, विधानपरिषद, विधानसभा बरोबरच येणार्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने मतदार यादीत नाव नोंद झाल्याची खात्री करावी.
ते म्हणाले, मतदार यादी वाचनासाठी व मतदार नोंदणीसाठी ज्या प्रमाणे गावांमध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात आल्या. त्याप्रमाणे महापालिका व नगरपालिका क्षेत्रातही अशा सभा घेऊन मतदार यादी वाचन करण्यात यावे. तसेच युवक मतदारांचा मतदार नोंदणीत सहभाग वाढावा यासाठी विद्यापीठ व महाविद्यालये यांच्याशी संपर्क साधून शिबिरे घेतली जातील. तसेच महाविद्यालयांच्या प्रवेशावेळीही मतदार नोंदणी असल्याची खात्री केली जाईल. नसल्यास मतदार नोंदणी केली जाणार आहे.
जिह्यात 57 दुबार नावांची नोंद
जिह्यात सुरु असलेल्या मतदार पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत 57 दुबार नावे नोंद असल्याचे समोर आले आहे. ही दुबार नावे ‘बीएलओ’ जागेवर जाऊन कमी करणार आहेत, तसे त्यांना निर्देश देण्यात आले आहेत, असे श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.