बहिरेश्वर येथे विविध विकास कामांचे उद्घाटन , जि प सदस्य सुभाष सातपुते यांच्या कामाचे कौतुक
सांगरूळ/प्रतिनिधी
करवीर मतदार संघातील प्रत्येक गाव वाड्या आणि वस्त्या विकास कामापासून वंचित राहणार नाहीत. बहिरेश्वर गावासह संपूर्ण सांगरुळ जिल्हा परिषद मतदार संघात जि. प. सदस्य सुभाष सातपुते यांनी दर्जेदार विकास कामे केली आहेत. उर्वरित अपूर्ण विकास कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देणार, अशी ग्वाही आमदार पी. एन. पाटील यांनी दिली.
बहिरेश्वर (ता. करवीर) येथे आमदार पी. एन. पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांच्या फंडातून केलेल्या विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुंभी कासारी साखर कारखान्याचे माजी संचालक सिताराम पाटील होते.
यावेळी बोलताना आमदार पी. एन. पाटील म्हणाले करवीर तालुक्यात पहिल्यांदाच घंटागाडी चे उद्घाटन करण्याचा योग बहिरेश्वर गावामध्ये आला. तसेच शहरी भागासारखे वॉटर एटीएम मशीन ग्रामीण भागात आल्यामुळे पाच रुपयाला वीस लिटर स्वच्छ पाणी या नावीन्यपूर्ण योजनेचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन केले.
स्वागत व प्रास्ताविक करताना जि .प सदस्य सुभाष सातपुते यांनी आमदार पी एन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगरुळ जिल्हा परिषद मतदारसंघात सर्वच गावे आणि वाड्या वस्त्यांना निधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून उर्वरित काळातही मतदार संघात विकास कामे राबवण्यासाठी प्रयत्नशील राहणार अशी ग्वाही दिली. यावेळी घंटागाडी, पथदिवे, वॉटर एटीएम मशीन तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र या विकास कामांचा लोकार्पण सोहळा आमदार पी. एन. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते महिला मंडळ यांना जाजम, डस्टबीन प्रदान करण्यात आले .सुभाष सातपुते यांचे फंडातून करवीर पश्चिम भागातील प्राथमिक शाळांना प्रयोग साहित्य व क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते सिताराम पाटील यांचा पंच्याहत्तरी निमित्त तसेच बहिरेश्वर गावातील पहिली महिला पोलीस म्हणून निवड झाल्याबद्दल काजल काशीद , पीएचडी मिळाल्याबद्दल रविंद्र बचाटे यांचा सत्कार करण्यात आला. गावामध्ये चांगल्या प्रकारचे विकास कामे केल्याबद्दल ग्रामपंचायत बहिरेश्वर यांच्यावतीने जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कुंभी कासारी कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन शामराव बाबुराव गोधडे ,माजी सरपंच सूर्यकांत दिंडे कोगे बहिरेश्वर बंधाऱ्याची दुरुस्ती व श्रीकृष्ण तलाव ते कसबा बीड रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली.
यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, करवीरचे उपसभापती अविनाश पाटील, माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, सरपंच युवराज दिंडे सर्व सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य तानाजी गोदडे यांनी केले तर आभार कोटेश्वर सेवा संस्थेचे चेअरमन रघुनाथ वरुटे यांनी मानले.