प्रतिनिधी / उस्मानाबाद
मराठवाडा विभागातील अनेक विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले असून ते वेगवेगळ्या या विभागात आज कार्यरत आहेत. तसेच बेरोजगारांच्या जागा भरल्या नसून निदेशकांच्या जागा देखील रिक्त आहेत. विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित असून मतदारांमध्ये रोष निर्माण झाला असून मतांच्या बेरजेपेक्षा विनाअनुदानित शिक्षकांच्या चुली पेटणं महत्वाचे आहे. या निवडणुकीत दोन्ही प्रस्थापित उमेदवारा विरोधात मतदारांमध्ये प्रचंड नाराजी असून या नाराजीचा फायदा आम्हालाच होणार असल्याचा ठाम विश्वास प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार प्रा. सचिन ढवळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि. २७ नोव्हेंबर रोजी व्यक्त केला.
येथील मेघमल्हार हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रहार अपंग संघटनेचे कार्यकारिणी सदस्य मयुर काकडे, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सयाजी देशमुख व प्रदीप बोधले आदी उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा. ढवळे म्हणाले की, लोकशाही वाचवा अभियानपासून प्रहार संघटनेची चळवळ सुरू झाली असून ती आज जनसामान्यामध्ये पोहोचलेली आहे.
आजपर्यंत बेरोजगारांसाठी आंदोलन करण्यात आली. मात्र, ती यशस्वी झालेली नाहीत. कारण संबंधितांनी याबाबत योग्य व ठोस भूमिका मांडली नाही. शिक्षक व पदवीधर यांचे प्रश्न सोडविण्याकडे देखील डोळेझाक करण्यात आली किंवा या प्रश्नासंदर्भात कोणीही बोलत नाहीत. त्यामुळे मला या मतदार संघात संधी दिली तर तरुणांच्या मागणीनुसार अनेक योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न करीन, असे सांगून ते म्हणाले की प्रत्येक तरुण एकत्रित असून ते आमच्या सोबत येत आहेत. ही आमची जमेची बाजू असून मागच्या वेळी पेक्षा एक लाखाच्या पटीने नवीन पदवीधर उमेदवारांची संख्या वाढली असून ती आमच्या पथ्यावर पडणार असल्याचे त्यांनी नमूद केले.