अखिलेश यांच्यासाठी ममता बॅनर्जींचा प्रचार
उत्तरप्रदेशच्या लखनौमध्ये सप अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममतादीदींनी भाजपला हरविले होते. ममतादीदी दिल्लीतून येथे आल्या, परंतु दिल्लीत राहणारे उत्तरप्रदेशात आले नाहीत अशा शब्दात अखिलेश यांनी मोदींना लक्ष्य केले आहे. कोरोना काळात लोक मरत असताना उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ कुठे होते? लोकांचे मृतदेह गंगेत सोडण्यास भाग पाडलेल्या कुटुंबांची भाजपने माफी मागावी असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
उत्तरप्रदेशला पैसे दिल्याचे मोदी सांगतात. मोदींनी काय स्वतःच्या खिश्यातून हे पैसे दिले का? हा सर्व पैसा राज्यांकडूनच मिळतो. हा जनतेचा पैसा आहे. उत्तरप्रदेशात उघड गुंडगिरी सुरू आहे. शेतकरी आंदोलन करत असताना भाजप मंत्र्याचा मुलगा शेतकऱयांवर गाडी घालून त्यांना चिरडत होता. भाजपशी माझी विचारसरणीची लढाई असल्याचे ममतांनी म्हटले आहे.
ब्राह्मण समुदाय अखिलेशसोबत
ब्राह्मण समुदायाचे लोक मला भेटण्यासाठी आले होते. त्यांनी अखिलेश यांना पूर्ण पाठिंबा देण्याची भूमिका मांडली आहे. यंदा उत्तरप्रदेशात 300 पार अखिलेश की सरकार येत आहे. बनावट एन्काउंटर करून लोकांना मारण्याची काय गरज होती? कायद्याद्वारे हे करता आले असते. भाजपने इतिहास बदलण्याचे काम केले आहे. हुतात्मा ज्योती नष्ट करण्यात आली. राज्यघटनेत भाजप फेरफार करू पाहत असल्याचा दावा ममतांनी केला आहे.
गर्वाची बाब
बंगालच्या भूमीवरून ममता बॅनर्जी आमच्यासोबत उपस्थित आहेत, ही समाजवादी पक्षासाठी गर्वाची बाब आहे. ममतांनी बंगाल निवडणुकीत सांप्रदायिक शक्तींना पराभूत करण्याचे काम केले. भाजपने पूर्ण फौज उतरविली तरीही ममतांनी त्यांना हरविले होते असे अखिलेश म्हणाले.