वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीची निवड करण्यासाठी बीसीसीआयने क्रिकेट प्रशासकीय समितीची (सीएसी) स्थापना करण्याचा निर्णय घेतला असून त्यात माजी खेळाडू मदनलाल गौतम गंभीर यांना स्थान दिले आहे. मुंबईची माजी महिला क्रिकेटपटू सुलक्षणा नाईक या समितीतील तिसऱया सदस्य असण्याची शक्यता आहे.
सुलक्षणा नाईक यांनी भारतातर्फे दोन कसोटी व 46 वनडे सामने खेळले आहेत. ‘मदनलाल व गौतम गंभीर सीएसीचे सदस्य होणार हे निश्चित आहे,’ असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱयाने सांगितले. 1983 मध्ये भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता, त्या संघाचे मदनलाल हे सदस्य होते. या समितीतील वरिष्ठ सदस्य असल्याने मदनलाल हे अध्यक्ष असतील. त्यानंतर 2011 मध्ये दुसऱयांदा भारताने विश्वचषक जिंकला, त्यात हिरो ठरलेला गौतम गंभीर व सुलक्षणा नाईक मदनलाल यांना मदत करतील.
ही समिती फक्त एकदाच एकत्र येण्याची शक्यता आहे. कारण त्यांना फक्त दोनच सदस्यांची नियुक्ती करायची आहे. निवड समिती अध्यक्षपदावर असलेले एमएसके प्रसाद व गगन खोडा यांचा कार्यकाल समाप्त झाल्याने त्यांच्या जागी नवीन निवड करावी लागणार आहे. सरणदीप सिंग व देवांग गांधी तसेच जतिन परांजपे यांचा चार वर्षाचा कालावधी संपण्यास अजून एक वर्षाचा अवधी आहे. त्याचप्रमाणे कनिष्ठ निवड समितीमध्येही बदल केला जाणार आहे.