प्रतिनिधी/ बेळगाव
चकाकत्या अक्षरांचे फलक, रंग देवून सुशोभीत केलेल्या भिंती, स्वच्छ परिसर आणि आल्हाददायी वातावरणात मद्यपींना आता आपला मद्यपानाचा आनंद घेता येणार आहे. खुद्द राज्य सरकारनेच मद्य विक्री दुकाने आणि बारमध्ये हा बदल करण्याची सुचना केली आहे. अशी वातावरण निर्मिती न केल्यास दुकानाचा अथवा बारचा परवाना रद्द केला जाईल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.
मद्याची दुकाने आणि बार यांचे स्वरुप पूर्णतः बदलावे यासाठी सरकारने काही मार्गदर्शक प्रणाली तयार केली आहे. जर दुकानांचा परिसर स्वच्छ नसेल किंवा ग्लास आणि तत्सम काचेची भांडी स्वच्छ धुतलेली नसतील तर कारवाई केली जाणार आहे.
याबाबत अबकारी मंत्री एच. नागेश यांनी सांगितले की बहुसंख्य मद्याची दुकाने आणि बार हे अस्वच्छ जागेत आणि अस्वच्छ वातावरणात कार्यरत आहेत. स्वच्छतेचा तेथे पूर्ण अभाव आहे. वास्तविक बार आणि मद्याची दुकाने ही आकर्षित दिसली पाहिजेत. जरी आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत आम्ही जरी पोहोचू शकलो नाही तर स्वच्छता राखणे आपल्या हातात आहे. म्हणूनच ही मार्गदर्शक प्रणाली तयार करण्यात आली आहे.
स्वच्छता हा महत्वाचा निकश आहेच. परंतु दुकानांची नावे सुध्दा आकर्षक आणि ठळक दिसली पाहिजेत. आतील फर्निचर आरामदाई आणि स्वच्छ हवे. जुन्या बार आणि दुकानांना भिंतींना रंग लावून वातावरण निर्मिती करण्याची सूचना देण्यात येणार आहे. एकदा सर्व बार आणि दुकानांना त्याबाबतचा आदेश पाठविल्यानंतर अबकारी अधिकारी सातत्याने त्यांची पाहणी करतील आणि मार्गदर्शक तत्वानुसार अमंलबजावणी नसेल तर परवाना रद्द केला जाईल, असेही मंत्री नागेश यांनी म्हटले आहे.
दरम्यान लॉकडाऊननंतर ऑनलाईन मद्यविक्री करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे. परंतु अद्याप आपण त्याबाबत निर्णय घेतलेला नाही. या प्रश्नाच्यासर्व पैलुंबाबत अभ्यास करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.