जामसंडे वेळवाडी येथील घटनेने खळबळ
प्रतिनिधी / देवगड:
जामसंडे वेळवाडी येथील आंबा कलम बागेमध्ये खत घातल्यानंतर त्यावर पालापाचोळा टाकत असताना सात कामगारांवर मधमाशांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात नेपाळी कामगार नवलसिंग भट्टे टामाटा (64) हे गंभीर जखमी झाल्याने देवगड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. धेंडू दौलत कदम (64, रा. इळये-असरोंडी) हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उर्वरित पाचजण पळाल्याने बचावले. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामसंडे वेळवाडी येथील प्रशांत सुंदर चांदोसकर यांची आंबा कलम बाग इळये असरेंडी येथील विलास बाळकृष्ण कदम यांनी कराराने घेतली आहे. विलास कदम हे प्रकाश विष्णू पवार, पुनोज गणपत करंजे, धेंडू दौलत कदम, नवलसिंग भट्टे टामाटा, करण टामटा, सूमन करण टामटा या कामगारांसह सोमवारी सकाळी कलमांना खत घालण्यासाठी गेले. दुपारी एका कलमाला खत घालून त्यावर पालापाचोळा घालण्यासाठी झाडी तोडत असताना अचानक मधमाशांनी या कामगारांवर हल्ला चढवला. हल्ला होताच पाच कामगार तेथून जीव मुठीत धरून पळाले. वयोवृद्ध नवलसिंग टामाटा व धोंडू कदम हे मधमाशांच्या हल्ल्यात सापडले. त्यात धोंडू कदम कापड अंगावर घेऊन तेथील चिखलात बसल्याने ते हल्ल्यातून बचावले. मात्र नवलसिंग टामाटा यांच्या संपूर्ण शरीरावर मधमाशांनी हल्ला केल्याने ते बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले. त्यांना तात्काळ देवगड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास हेड कॉन्स्टेबल एस. डी. कांबळे करीत आहेत.