दुबई : दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज अजिंक्य रहाणेने आयपीएल स्पर्धेत संघाच्या गरजेनुसार मधल्या फळीतही फलंदाजी करण्याची तयारी दर्शवली आहे. दिल्ली संघात शिखर धवन, पृथ्वी शॉ, जेसॉन रॉय व ऍलेक्स कॅरे असे दिग्गज फलंदाज सलामीसाठी उपलब्ध आहेत. त्या पार्श्वभूमीवर रहाणे बोलत होता.
2019 आयसीसी विश्वचषक स्पर्धेत ज्या चौथ्या स्थानासाठी बरेच वादंग रंगले, त्या स्थानी आपण चपखल बसलो असतो, अशी टिपणी त्याने यावेळी केली. ‘गतवर्षी इंग्लंडमध्ये संपन्न झालेल्या आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेत चौथ्या स्थानी फलंदाजीची संधी मिळेल, असा माझा होरा होता. पण, तसे झाले नाही आणि आता त्याबद्दल अधिक विचार करण्यात काही अर्थही नाही. मात्र, विश्वचषक स्पर्धेपूर्वी मी कौंटी क्रिकेट खेळत होतो. त्यामुळे, मला अधिक आशा होती’, असे रहाणे पुढे म्हणाला.
वनडे क्रिकेटमध्ये रहाणेने 33 सामन्यात मधल्या फळीत फलंदाजी केली तर 54 सामन्यात तो सलामीला उतरला आहे. 2020 आयपीएल स्पर्धेदरम्यान संघाला आवश्यकता असेल तर मधल्या फळीत खेळण्याची तयारी त्याने येथे दर्शवली. आश्चर्य म्हणजे आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 132 सामन्यात चक्क 110 वेळा तो सलामीला उतरला आहे. रहाणे दिल्ली प्रँचायझीसाठी नवा आहे. यापूर्वी तो या स्पर्धेत राजस्थान रॉयल्सतर्फे खेळला होता.
‘दिल्ली कॅपिटल्स संघात माझी भूमिका काय असेल, याची मला अद्याप कल्पना नाही. हे स्पष्ट होण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. अर्थात, प्रत्येक पर्यायासाठी मी तयार असेन. सर्वोत्तम खेळ साकारणे हाच माझा प्राधान्यक्रम असतो. मी स्वतः फलंदाजीचा आनंद लुटतो आणि त्यामुळे आपण कोणत्या क्रमांकावर उतरलो आहोत, हे गैरलागू होते’, असे त्याने पुढे स्पष्ट केले.
‘मागील 5-6 महिन्यांच्या कालावधीत आपण अजिबात व्यावसायिक क्रिकेट खेळलेले नाही. त्यामुळे, संघात आपली नेमकी भूमिका काय हे निश्चित झाल्यानंतर 6-7 सत्रात त्यानुसार सरावावर भर देता येतो’, याचा रहाणेने यावेळी उल्लेख केला.
सध्याच्या घडीला दिल्ली कॅपिटल्सचा संघ युएईमध्ये दाखल झाल्यानंतर 7 दिवसांकरिता क्वारन्टाईन असून हा कालावधी पूर्ण केल्यानंतर ते सरावाला सुरुवात करतील.