इराणच्या विदेश मंत्र्यांची अपेक्षा, नेत्यांशी चर्चा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सध्या मध्यपूर्वेत तणावग्रस्त वातावरण असून हा तणाव दूर करण्यासाठी भारत महत्वाची भूमिका घेऊ शकतो, असे वक्तव्य भारताच्या दौऱयावर आलेले इराणचे विदेश मंत्री जवाद झरीफ यांनी केले आहे. झरीफ यांनी बुधवारी भारताच्या महत्वाच्या नेत्यांशी द्विपक्षीय संबंध आणि सध्याच्या स्थितीवर चर्चा केली.
सध्या अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढला आहे. इराणचा प्रमुख लष्करी अधिकारी सुलेमानी याची अमेरिकेच्या हल्ल्यात हत्या झाली होती. त्यानंतर इराणनेही इराकमधील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला हाता. तथापि आता हा तणाव कमी झाला आहे.
इराण गेली अनेक दशके भारताचा मित्र असून त्या देशावर आर्थिक निर्बंध लावले जाण्यापूर्वी भारत त्याचे इंधन तेल खरेदी करीत असे. भारताला तेलपुरवठा करण्यात इराणचा दुसरा क्रमांक होता. भारतीय कंपन्यांनी इराणमध्ये गुंतवणूकही केली आहे. मध्यपूर्वेत तणाव वाढल्यास जागतिक बाजारात कच्च्या इंधन तेलाचे दर वाढून भारतासह अन्य देशांच्या अर्थव्यवस्थांवर विपरीत परिणाम होते. म्हणून भारत हा तणाव निवळावा म्हणून आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. भारताने या संदर्भात अमेरिका, सौदी अरेबिया इत्यादी देशांची चर्चा केली आहे.