प्रतिनिधी/इचलकरंजी
येथे कामधंद्यानिमित्त मध्यप्रदेशातून आलेल्या ९९ जणांना आज, सोमवारी (दि-११) मूळ गावी रवाना करण्यात आले. या सर्वांना कोल्हापूर येथे पोहोचवण्यासाठी नगरसेवक मदन कारंडे यांनी बसेस उपलब्ध करून दिल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील यंत्रमागासह अन्य उद्योग व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. यामुळे येथे रोजगारासाठी आलेले परप्रांतीय कामगार हे त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी प्रयत्नशील होते. या अनुषंगाने शासन निर्देशानुसार पालिका प्रशासनाने राज्यनिहाय शहरातील परप्रांतीय कामगारांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवली होती. यामध्ये मध्य प्रदेशातील ९९ कामगार आणि नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने रेल्वेने सोमवारी त्यांच्या मुळे गावी रवाना करणेत आले. यासर्वांना इचलकरंजीतून कोल्हापूर रेल्वे स्टेशन येथे नेण्यासाठी नगरसेवक मदन कारंडे यांनी बालाजी पब्लिक स्कूल या शैक्षणिक संस्थेच्या ४ बसेस स्वखर्चाने उपलब्ध करुन दिल्या. पालिकेतर्फे बसेसचे निर्जंतुकीकरण करुन आणी सोशल डिस्टनसिंग पाळूनच या नागरीकांना पाठवणेत आले.
प्रवासामध्ये आवश्यक पिण्याच्या पाण्याची सोय महेश सोनवणे यांनी केली. यावेळी मुख्याधिकारी संतोष खांडेकर, उपमुख्याधिकारी केतन गुजर, सहा.नगररचनाकार रणजित कोरे, कामगार अधिकारी विजय राजापुरे, नगर अभियंता संजय बागडे, शाखा अभियंता सुभाष देशपांडे, रचना सहाय्यक नितिन देसाई, तेजस इंगळे, मंडल आधिकारी प्रणव भगले, वाहन अधिक्षक राजेंद्र मिरगे, जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे, भागोजी निर्मळे, अनिल कांबळे, संजय कांबळे यांच्यासह नगरपरिषद आधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.