7 हजारहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविले
वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशमध्ये सलग तीन दिवस असलेल्या अतिवृष्टिमुळे महापूर स्थिती निर्माण झाली आहे. 9 जिह्यातील सुमारे 400 गावात पुराने थैमान माजविले आहे. हवाईदल हेलिकॉप्टरद्वारे पुरात अडकलेल्या लोकांची सुटका करत आहे. यामध्ये गरोदर महिलांसह वृद्ध, मुलांचा समावेश आहे. 7000 हून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. अनेक घरे वाहून गेल्याने बेपत्ता लोकांचे प्रमाण जास्त आहे.
अतिवृष्टिमुळे मध्यप्रदेशमध्ये शनिवारी रात्रीपासून राज्य प्रशासनाची आपत्ती निवारण मोहीम चालू आहे. या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी रविवारी तत्काळ बैठक बोलाविली होती. या बैठकीमध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांसाठी तसेच त्यांच्या सोयीसाठी अनेक आदेश प्रशासनास दिले. तसेच पंतप्रधान मोदींना या कठीण प्रसंगासंदर्भात माहिती देण्यात आली. केंद्राकडून हवाईदलाची इतर पथकांची मदत मागण्यात आली. 7000 हून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. अनेक घरे वाहून गेल्याने बेपत्ता लोकांचे प्रमाण जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री चौहान यांनी धोकादायक गावांतील लोकांना सुरक्षितस्थळी असलेल्या छावणीमध्ये आसरा घेण्याचे आवाहन केले आहे. कन्हान, पेंच, तेंदुनी रायसेन नदीकाठच्या गावांमध्ये मोठय़ाप्रमाणात पाणी शिरले आहे. भोपाल, रायसेन, छिंदवाडा, उदयपूर, बरेली, सिहोर आदी ठिकाणी पुराचा फटका बसला आहे.