ऑनलाईन टीम / भोपाळ :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सीमालगत असणाऱ्या बालाघाट आणि छिंदवाडा या दोन जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला असल्याची घोषणा करण्यात आली आहे. रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत हा कर्फ्यू असणार आहे.
बालाघाटचे जिल्हाधिकारी दीपक आर्य यांनी मंगळवारी आदेश जारी केले आहेत. या आदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्रात वाढत चाललेल्या रुग्णांचे प्रमाण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे कडक पालन करणे, मास्क लावणे यासह कोरोना रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.
- आदेशानुसार, सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पहिल्यांदा जिल्हा प्रशासनाकडून परवानगी घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. जिल्ह्याच्या सर्व सीमाजवळ 5 पेक्षा अधिक जण एकत्र आलेल्या दिसल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
- कलम 144 चे पालन करून गर्दी आणि जमावावर पूर्णपणे प्रतिबंध लावला जाणार आहे.
- रात्री 10 ते सकाळी 6 यावेळेत लोकांना घराबाहेर पडण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.
- घरातून बाहेर पडताना मास्क लावले बंधनकारक असणार आहे.