ऑनलाईन टीम / शाजपूर :
मध्यप्रदेशातील शाजपुर जिल्ह्यातील बीजनाखेडी गावातील एका शेतात विहिरीची भिंत बांधायचे काम चालू असताना एक भिंत कोसळून चार मजुरांचा मृत्यू झाला असल्याची बातमी समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या चार मजुरांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. याबाबत अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी डी. के. जैन यांनी सांगितले की, ही घटना मंगळवारी संध्याकाळी 6.30 वाजता बिजनाखेडी गावात घडली. यावेळी 40 फूट खोल खणलेल्या विहिरीची भिंत बांधायचे काम चालू असताना खाली काम करणाऱ्या मजुरांवर भिंत कोसळली.
पुढे ते म्हणाले, या घटनेनंतर लगेचच यंत्रांच्या साहाय्याने बचाव कार्यास सुरुवात केली गेली आणि 12 तासांच्या प्रयत्नानंतर बुधवारी सकाळी 11.30 वाजता मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विहिरीचे मालक कालू सिंह सिंधिया आणि त्यांचा भाऊ नारायण सिंह यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही फरार आहेत. दरम्यान, मृतांची ओळख पटली असून कंकू बाई (30), लीला बाई (35), भूरी बाई (24) आणि पृथ्वी सिंह (26) अशी त्यांची नावे आहेत. पोस्टमार्टम नंतर मृतदेह त्यांच्या परिवाराकडे सोपवण्यात आले आहेत.