केंद्र सरकारचा निर्णय – 11.8 कोटी विद्यार्थ्यांना लाभ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकार मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवणार आहे. सरकार देशातील 11.8 कोटी विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे पाठवणार आहे. यासाठी 1,200 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधीही जारी करण्यात आला आहे. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे मुलांना देण्यात येणार आहे. कोविड कालावधीत मुले शाळेत जाऊ शकत नसल्यामुळे, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक मध्यान्ह भोजन योजनेतील सर्व पात्र मुलांच्या आहाराची किंमत त्यांच्याकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला शिक्षणमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. या निर्णयामुळे मध्यान्ह भोजन योजनेला चालना मिळणार असल्याचे सरकारचे मत आहे.
‘एमडीएम’ योजनेंतर्गत केंद्र सरकार सुमारे 11.8 कोटी विद्यार्थ्यांना डीबीटीमार्फत आर्थिक मदत देईल. या योजनेसाठी 1200 कोटी निधी देण्यात येईल, असे ट्विट केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशभरातील 11.20 लाख सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात शिकणाऱया सुमारे 11.8 कोटी मुलांना होणार आहे.