शिक्षण मंत्रालयाकडून राज्यांना निर्देश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकारानंतर शाळांमध्ये पुरविल्या जाणाऱया मध्यान्ह आहारात आता राज्यांना फोर्टिफाइड (पौष्टिकतेने भरपूर) तांदळाचा वापर करावा लागणार आहे. तसेच याचा वापर वाढविण्यासाठी आवश्यक पावले उचलावी लागणार आहेत.
शाळांमध्ये मुलांना देण्यात येणाऱया मध्यान्ह आहारात साधारण तांदळाऐवजी फोर्टिफाइड तांदळाचा वापर करण्याची योजना आखण्यात यावी. भारतीय खाद्य निगमाशी (एफसीआय) यासंबंधी संपर्क साधावा असा निर्देश शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्यांना दिला आहे.
एफसीआयकडे सध्या 7.59 लाख टन फोर्टिफाइड राइस उपलब्ध आहे. हा साठा विविध राज्यांमध्ये आहे. साठा उपलब्ध असलेल्या राज्यांमधून हा फोर्टिफाइड राइस प्राथमिकतेने मिळविला जावा असे शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
शिक्षण मंत्रालयाने अलिकडेच यासंबंधी सर्व राज्यांसोबत चर्चा केली होती. या चर्चेत फोर्टिफाइस राइसच्या वापरावरून राज्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले होते. याच्या खरेदीच्या किमतीत येणाऱया फरकाची भरपाई केंद्र सरकार करणार असल्याचे राज्यांना सांगण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्याच्या प्राचीरवरून कुपोषणाच्या उच्चाटनाच्या मोहिमेची घोषणा केली होती. 2024 पर्यंत सर्व शासकीय योजनांच्या अंतर्गत मिळणाऱया तांदळाला फोर्टिफाइड करण्यात येईल असेही त्यांनी म्हटले होते. तसेच त्यांनी रेशनच्या दुकानांना आणि मध्यान्ह आहार यासारख्या योजनांना फोर्टिफाइड राइस देण्यास सांगितले होते. फोर्टिफाइड राइसयच वापरामुळे लोकांना उत्तम पोषण पुरविता येणार असल्याचे त्यांचे म्हणणे होते. सद्यकाळात फोर्टिफाइड राइसचा वापर काही निवडक जिल्हय़ांमध्ये मध्यान्ह आहार योजनेकरता केला जात आहे.