भाजपचे लक्ष सध्या केवळ पालिका निवडणुकीवर
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात कोणत्याही परिस्थितीत मध्यावधी विधानसभा निवडणूक होणार नाही, असे स्पष्ट मत गोवा भाजपाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी व्यक्त केले आहे. सध्या आमचे लक्ष पूर्णपणे पालिका निवडणुकीवर केंद्रीत असून विधानसभा निवडणूक नियोजित वेळेनुसार म्हणजेच 2022 मध्येच होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पणजीत भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. तानावडे बोलत होते. लवकरच 12 पालिकांची निवडणूक होणार आहे. जिल्हा पंचायती प्रमाणेच पालिका निवडणुकीतही पूर्ण बहुमत मिळविण्याचे आमचे प्रयत्न असतील. ही निवडणूक पक्षीय चिन्हावर होईल की नाही हे अद्याप स्पष्ट नसले तरीही सर्व पालिकामधून भाजपचेच कार्यकर्ते विजयी होतील याची आपणास पूर्ण खात्री आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक मुदतपूर्व घेण्याचा भाजपचा कोणताही विचार नाही, असे तानावडे म्हणाले.
आयआयटी प्रकल्प होणारच
आयआयटी प्रकल्प केवळ भाजपास नव्हे तर संपूर्ण गोव्यासाठी भूषणावह आहे. असा प्रकल्प मिळणे हे आमचे भाग्य आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे ते स्वप्न होते. त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी सरकार प्रयत्नशील आहे, त्यामुळे जो निर्णय सरकार घेईल त्याला पार्टीचा पूर्ण पाठिंबा असेल. सध्या या प्रकल्पास मेळावलीवासीय जोरदार विरोध करत आहेत, मात्र त्यांचे मन वळवून योग्य तोडगा काढण्यात मुख्यमंत्री यशस्वी होतील, असा विश्वास तानावडे यांनी व्यक्त केला.
काही राजकीय पार्टी मेळावलीत जाऊन गैरमार्गाने श्रेय घेण्याचे प्रयत्न करत आहे. त्यांच्याच चिथावणीतून आंदोलनादरम्यान काही ग्रामस्थांनी ज्या प्रकारे पोलिसांवर हल्ला चढविला, त्यांच्या वाहनांना आग लावण्याचे प्रयत्न केले ते सर्व प्रकार गुन्हेगारी स्वरुपाचेच होते. त्यामुळे त्यांना लावण्यात आलेले कोणतेही कलम मागे घेतले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
यापुढे मुख्यमंत्री मेळवलीत जाणार नाहीत
चर्चेद्वारे कोणताही प्रश्न सुटू शकतो. सांगेतील ऊस उत्पादकांचा प्रश्न चर्चेद्वारेच सोडविण्यात सरकारला यश आले. त्याच प्रकारे मेळावलीवासियांनीही चर्चेसाठी यावे असे आवाहन मुख्यमंत्री वारंवार करत आहेत. एवढेच नव्हे तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्या गावात जाऊन चर्चा करण्याचेही प्रयत्न केले, परंतु त्यावेळी ग्रामस्थ बाजूलाच राहिले व राजकीय श्रेय उपटण्यासाठी टपलेल्या भलत्याच लोकांनी तेथे गोंधळ घालून चर्चा यशस्वी होऊ दिली नाही. त्यामुळे यापुढे मुख्यमंत्री त्या गावात पुन्हा कधीच जाणार नाहीत आणि आपण त्यांना जाऊ देणार नाही. त्याचबरोबर आपण स्वतःही तेथे जाणार नाही. या विषयात आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नाही, असे तानावडे यांनी स्पष्ट केले.
सरकार एखादा प्रकल्प हाती घेते तेव्हा पूर्ण विचारांतीच पाऊल टाकते. त्यामुळे ग्रामस्थांचे कोणतेही प्रश्न, समस्या असतील तर त्या चर्चेद्वारे सोडविता येतात. त्यासाठी त्यांनी पुढे आले पाहिजे, असे तानावडे म्हणाले. आयआयटीस यापूर्वी काणकोणमध्येही विरोध झाला होता. तेथून ती सांगे येथे नेण्याचे ठरले, अशाप्रकारे प्रत्येक ठिकाणी विरोध होत राहिल्यास तो प्रकल्प गुंडाळावा लागेल, आणि ते आम्ही होऊ देणार नाही, असे ते म्हणाले.
चर्चेद्वारे सर्वमान्य तोडगा काढावा
आयआयटी मेळावलीतच होईल की नाही हे आपण सांगू शकत नाही, परंतु सरकार जो निर्णय घेईल तो मान्य असेल व आपण पक्ष म्हणून त्याचे समर्थन करेन असे त्यांनी स्पष्ट केले. मेळावलीवासियांनी मुख्यमंत्र्यांना भेटावे, नपेक्षा स्थानिक आमदारास भेटावे. चर्चेद्वारे सर्वमान्य असा तोडगा काढावा, असे आपणही आवाहन करत असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर या विषयात स्थानिकांनी बाहेरील लोकांचा पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न केल्यास त्यातून काहीच साध्य होणार नाही, असा इशाराही तानावडे यांनी दिला.