ऑनलाईन टीम / इंदौर :
मध्य प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढती रुग्ण संख्या रोखण्यावर उपाय करण्यासाठी सरकारकडून एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान देखील सहभागी झाले होते.
या बैठकीत ज्या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अधिक आहे अशा 11 जिल्ह्यांमध्ये रात्री 10 ते सकाळी 6 यावेळेत सर्व दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच बाहेर पडताना मास्क घळणे अनिवार्य करण्यात आले आहे.
दरम्यान, प्रशासनाने आणखी एक कडक निर्णय घेतला आहे. यानुसार, जे नागरिक मास्क घातल्या शिवाय घराबाहेर फिरतील त्यांची रवानगी थेट तुरुंगात केली जाणार आहे.
याबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी मनीष सिंह म्हणाले, आपण डेंजर झोनमध्ये असून आपल्याला अधिक सावध रहाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे निर्बंधांची अधिक कठोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. मास्कशिवाय रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या त्यांना थेट तुरुंगात धाडले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.
पुढे ते म्हणाले, एका बेजबाबदार व्यक्तीमुळे अन्य लोकांच्या जीवाला धोका होता कामा नये, त्यामुळे सर्वांनी बाहेर पडताना मास्क घालावा, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, एका दिवसात 2,631 बेजबाबदार नागरिकांकडून तब्बल 3 लाख 28 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.