- मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी घेतला प्रदेशातील कोरोना स्थितीचा आढावा
ऑनलाईन टीम / भोपाळ :
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. मध्य प्रदेशात तर चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रदेशातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, प्रदेशात लॉकडाऊन केले जाणार नाही. मात्र, कोविड अजून पूर्णपणे गेलेला नाही, बदलत्या वातावरणात हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना सावधानी बाळगत सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे.
पुढे ते म्हणाले, प्रदेशात लॉकडाऊन नाही केले जाणार पण कॉलेज आणि शाळा अजूनही बंदच राहतील. थिएटरमध्ये देखील केवळ 50 % क्षमतेने सुरू केले जाणार आहेत. तसेच आपल्या सर्वांना हे लक्षात ठेवावे लागणार आहे की, जो पर्यंत कोरोनावर लस येत नाही, तो पर्यंत दुर्लक्ष नाही.. सर्व नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी गरजेची आहे.
- रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत कर्फ्यू
प्रदेशात लॉकडाऊन केले नसले तरी कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन काही जिल्ह्यांमध्ये रात्री पुन्हा एकदा कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला जात आहे. भोपाळ, इंदोर, ग्वालियर, रतलाम आणि विदिशा या जिल्ह्यात आज रात्रीपासून रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रातकालीन कर्फ्यू लावला जात आहे . या काळात केवळ अत्यावश्यक सेवा आणि फॅक्टरीच्या कर्मचाऱ्यांना ये जा करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पुढे ते म्हणाले, रुग्ण वाढीचे प्रमाण 5% पेक्षा अधिक असणाऱ्या जिल्ह्यात कर्फ्यू लावण्यात आला आहे. अन्य ठिकाणची परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी निर्णय घेतील. तसेच जे कोणी नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असेही चौहान यांनी यावेळी स्पष्ट केले.