ममतांच्या चंडीपठणावर पंतप्रधान मोदींचे विधान : पुरुलिया येथील सभेला केले संबोधित
वृत्तसंस्था / एपुरुलिया
पश्चिम बंगालच्या राजकीय रणकंदनात सामील होत गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुरुलिया येथील सभेत स्वतःच्या भाषणाला बंगाली भाषेतून सुरुवात केली आहे. ममतादीदींना बंगालच्या जनतेच्या हितापेक्षा अधिक खेळाची चिंता लागून राहिली. पण यंदा जनताच त्यांच्या विरोधात उभी आहे. 10 वर्षांच्या तुष्टीकरणानंतर, लोकांवर लाठीमार केल्यावर ममतादीदी आता अचानक बदललेल्या दिसून येत आहेत. हे त्यांचे मनपरिवर्तन नसून पराभवाची भीती असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
पुरुलियाची भूमी ही भगवान राम आणि माता सीता यांच्या वनवासाची साक्षीदार राहिली आहे. राज्यात पूर्वी डावे आणि आता तृणमूल सरकारने उद्योगांना बहरू दिले नाही. येथे लोकांच्या समस्यांवर लक्ष देण्याऐवजी तृणमूल सरकार स्वतःच्या खेळातच गुंतून राहिले. तृणमूल आणि डाव्यांनी पुरुलियाला जलसंकट, पलायन आणि भेदभावपूर्ण शासन दिल्याचे मोदी म्हणाले.
रोजगाराच्या संधी निर्माण करू
पुरुलिया समवेत पूर्ण क्षेत्रामध्ये विकासाच्या असंख्य शक्यता आहेत. पश्चिम बंगालच्या प्रत्येक हिस्स्याला रेल्वेसेवेशी जोडण्यास आमचे प्राधान्य आहे. सद्यकाळात राज्यातील विविध भागांमध्ये 50 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. भाजपचे सरकार येताच प्रेट कॉरिडॉरचे काम सुरू करण्यात येईल. पुरुलियाही याच्याशी जोडला जाणार असून रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे मोदींनी म्हटले आहे.
ममतांचे क्रूर सरकार
मां, मानुस आणि माटीबद्दल बोलणाऱया ममतांच्या मनात दलित, मागास आणि आदिवासींबद्दल ममत्व असते, तर त्यांनी येथे विकास घडवून आणला असता. पण ममतांनी येथे माओवादी माफियांची फौज तयार केली. येथील वाळू माफिया आणि कोळसा माफियांना कुणाचा वरदहस्त आहे हे सर्वजण ओळखून असल्याचे विधान मोदींनी केले आहे.
बाटला हाउसचा उल्लेख
विरोधकांनी देशाच्या सैन्यावर सत्तापालटाचा प्रयत्न करण्याचा आरोप केला होता हे बंगालच्या जनतेच्या आठवणीत आहे. पुलवामा येथे हल्ला झाला तेव्हा ममतादीदी कुणासोबत उभ्या होत्या हेही सर्वांना चांगले आठवते. दिल्लीच्या न्यायालयाने बाटला हाउसशी संबंधित महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या निर्णयाने दहशतवाद आणि त्यांना साथ देणाऱयांचा चेहरा उघड झाला आहे. बाटला हाउस चकमकीत एक पोलीस अधिकारी हुतात्मा झाला. पण त्यावेळचे ममतादीदी आणि त्यांच्या पक्षाचे वर्तन कुणीच विसरू शकत नाही. ममतादीदी दहशतवादाच्या बाजूने उभ्या राहिल्या होत्या. बंगालमध्ये घुसखोरीला बळ देण्याचे एक कारण तुष्टीकरण आहे. भारताला वंदेमातरम् शिकविणाऱया या भूमीवर ममतांकडून पुणालाच अशाप्रकारची अपेक्षा नव्हती असे म्हणत मोदींनी त्यांना लक्ष्य केले आहे.
ममता लवकर बऱया व्हाव्यात
आमच्यासाठी ममतादीदी देखील भारताच्या एक कन्या आहेत, ज्यांचा सन्मान करणे आमच्या संस्कारांमध्येच सामील आहे. ममतांना ईजा झाल्यावर आम्हालाही चिंता झाली. त्या लवकरात लवकर बऱया व्हाव्यात अशी माझी प्रार्थना आहे. विकासाच्या प्रक्रियेत सर्व पक्ष एकत्र आल्यावरच पश्चिम बंगाल प्रगती करू शकतो. पण ममतादींनी येथील दलित, मागास आणि आदिवासींना आपलं मानलंच नाही. येथील भ्रष्टाचारामुळे सर्वाधिक नुकसान आदिवासी आणि गरिबांचेच झाले आहे. केंद्र सरकारकडून गरिबांसाठी स्वस्त तांदूळ पाठविण्यात येतो, तो देखील तृणमूलचे तोलाबाज सोडत नाहीत असे मोदी म्हणाले.
सोनार बांग्ला होबे
ममतादीदी खेला होबे म्हणत आहेत, तर भाजप विकास होबे, सोनार बांग्ला होबे म्हणतोय. आमचे धोरण ‘डीबीटी’ आहे. डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तर बंगालमध्ये ‘टीएमसी’ धोरण आहे. टीएमसी म्हणजे ‘ट्रान्सफर माय कमिशन’. आम्ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करत आहोत. तर ममतादीदींचा तृणमूल काँग्रेस ‘ट्रान्सफर माय कमिशन’मध्ये गुंतलेला असल्याचे मोदींनी म्हटले आहे.