प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील शाळाबाहय़ विद्यार्थ्यांची गणती करण्याची जबाबदारी मनपावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे सर्वेक्षण सुरू करण्याची सूचना मनपा आयुक्तांनी सोमवारी बैठक घेऊन केली होती. त्यानुसार मनपाच्या महसूल निरीक्षकांनी सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. घरोघरी जाऊन शाळाबाहय़ विद्यार्थ्यांची माहिती घेण्यात येत आहे.
शाळाबाहय़ विद्यार्थ्यांची गणती करण्याची जबाबदारी शिक्षण खात्यावर सोपविण्यात येते. मात्र यंदा गणतीचा भार स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपविण्यात आला आहे. शहरातील शाळाबाहय़ विद्यार्थ्यांची माहिती घेण्याची जबाबदारी महापालिकेकडे देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण खाते आणि महानगरपालिकेच्या महसूल विभागाच्या कर्मचाऱयांकरवी शाळाबाहय़ विद्यार्थ्यांच्या गणतीचे काम हाती घेण्यात आले आहे. शहरातील प्रत्येक सर्वेक्षणाचे काम महापालिकेच्या महसूल विभागाकडे सोपविण्यात येते. त्यामुळे महसूल वसुलीवर परिणाम होत आहे. प्रत्येक सर्वेक्षणाचे काम सोपविण्यात आल्याने शाळाबाहय़ गणतीचे काम शिक्षण खात्याकडून करवून घ्यावे, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली होती. मात्र महापालिका आयुक्तांनी हे काम करावेच लागणार, अशी सूचना केली होती. या गणतीसाठी प्रशिक्षण देण्यात आले होते. मोबाईल ऍपद्वारे घरोघरी जाऊन सदर माहिती घेण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र हे काम सुरू झाले नसल्याने सोमवारी महसूल विभागाच्या कर्मचाऱयांची बैठक घेऊन शाळाबाहय़ विद्यार्थ्यांची गणती करण्याची सूचना महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी केली आहे. त्यामुळे सदर कामास मनपा प्रशासनाने सुरुवात केली आहे. प्रत्येक वॉर्डनिहाय सर्वेक्षणाचे काम करण्यात येत असून, घरोघरी जाऊन ऍपद्वारे माहिती नोंद करण्यात येत आहे. रेशनकार्ड, आधार कार्ड आदी माहितीसह घरात किती मुले आहेत? शाळेला जातात की नाही याबाबतची सविस्तर माहिती देण्यात येत आहे. शाळेला जात नसल्यास त्याबाबतचे कारण जाणून घेऊन नोंद करण्यात येत आहे.