प्रतिनिधी / मिरज
शहरात अनेक ठिकाणी कंटेनरच नसल्याने दररोज कचऱयाचे ढिग साचलेले दिसतात. काही ठिकाणी दलदलीचे साम्राज्य आहे. अमृत योजनेच्या खुदाईमुळे रस्त्यावरचा धुरळा थांबता थांबेना, पुरूष स्वच्छतागृहाची वाणवा, महिला स्वच्छतागृहाचा तर पत्ताच नाही. याकडे कधीही गांभीर्याने न पाहिलेल्या मनपाने आता मानपत्रासाठी चक्क ‘स्वच्छता अभियान’ हाती घेतले आहे. केवळ फलक आणि भिंती रंगवून शहराची स्वच्छता होणार आहे का? त्यापेक्षा शहर स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी मिरजकरांतून होऊ लागली आहे.
सध्या राज्यभर स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान राबविले जात आहे. त्यानिमित्ताने महापालिका क्षेत्रात स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत स्वच्छ शहर, सुंदर शहर असण्याचा मान महापालिकेला मिळणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्याची समिती सर्व्हेक्षण करणार असून, महापालिकेला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या सर्व्हेक्षणात आपल्याही महापालिकेचा समावेश असावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य आणि स्वच्छता विभागाचे कर्मचारी शहराची स्वच्छता करण्यासाठी स्वतःला झाकून देऊन प्रयत्न करताना दिसत आहेत.
अभियान सुरू झाल्यापासून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी फलक लावले गेले आहेत. शासकीय इमारती, शाळा, महाविद्यालयांच्या भिंती रंगवून स्वच्छता अभियानात सहभागी होण्यासाठी जनजागृती केली जात आहे. शहरातील मनपा कार्यालयही यातून सुटू शकले नाही. बऱयाच ठिकाणी स्वच्छतेचे फलही झळकले आहेत. शहरात अनेक ठिकाणी आजही घाणीचे साम्राज्य दिसते. ते हटविण्याचा प्रयत्न केला जात असला तरी ही अस्वच्छता कायमस्वरुपी नष्ट व्हावी, यासाठी मात्र भरीव प्रयत्न होताना दिसत नाहीत.
शहरात बुवाचा हौद, विद्या मंदिर रस्ता, हिंदमाता चौक ते अग्निशमन विभाग रस्ता, लक्ष्मी मार्केट परिसर, दत्त चौक, नागोबा कट्टा, दर्गा रोड, बालगंधर्व नाटय़गृह, गुरुवार पेठ, सांगली वेस रेल्वे स्टेशन रोड अशा अनेक ठिकाणी कचऱयाचे ढिग, रस्त्यावर सांडपाणी आल्याने निर्माण झालेली दलदल, मोठे खड्डे आणि अमृत योजनेमुळे प्रत्येक रस्त्यावर दिवसभर उठणारा धुरळा यामुळे शहराला बकाल स्वरुप आले आहे. ऐन थंडीच्या दिवसातच नागरिकांना या धुरळ्यामुळे दम्याच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरचा कचरा मनपा अधिकाऱयांना दिसत नाही. शहराच्या अशा परिस्थितीत स्वच्छता अभियान खऱया अर्थाने यशस्वी होणार का? असा नागरिकांसमोरचा प्रश्न आहे. याशिवाय भटकी कुत्री, मोकाट जनावरे यांचा दररोजचा उपद्रव सुरूच असतो. लोणी बाजारात रात्री आठनंतर भाजीविक्रेत्यांनी टाकलेला कचरा जागोजागी दिसून येतो. याशिवाय वन्टमुरे कॉर्नर ते आंबेडकर पुतळा, शिवाजीनगर परिसर, आरफा हॉटेल लेन परिसर, शिवाजी रोड अशा ठिकाणी हॉटेल्सचा कचरा व जैविक कचरा रस्त्यावर पडलेला असतो.
महिला स्वच्छतागृहाचा तर शहरात पत्ताच नाही. पुरुषांसाठी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी स्वच्छतागृहे आहेत, मात्र त्यांची अवस्थाही दयनीय झाली आहे. काही स्वच्छतागृहे राजकीय दबावातून रात्रीत पाडून टाकण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत मनपा प्रशासनाने अद्याप ठोस भुमिका घेतली नाही.
मनपा प्रशासन स्वच्छता अभियान राबवून मानपत्र मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. प्रत्यक्षात मात्र शहर स्वच्छतेसाठी अपेक्षित प्रयत्न होताना दिसत नाहीत. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मनपा प्रशासनाने शहर स्वच्छतेसाठी कायम स्वरुपी उपाययोजना राबवावी. ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवणार नाही. रस्त्याची केवळ मलमपट्टी करुन डांबरीकरण केल्याचा भास निर्माण करण्यापेक्षा दर्जेदार कामाला प्राधान्य देऊन शहराच्या विकासाचा दर्जा उंचावावा, अशी मागणी होताना दिसत आहे.
मनपा फलकाकडे दूर्लक्ष
मनपा मिरज विभागीय कार्यालय इमारतीची समोरीची बाजू स्वच्छ भारत अभियानाच्या संदेशाने रंगविण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे या इमारतीची रंगरंगोटीच झाली नसल्याने काळपट पडलेल्या इमारतीवर हा संदेश उठावदार दिसतो. याचवेळी मनपाच्या नावाचा फलक मात्र रंगविण्याचे तारतम्य दाखविण्यात आले नाही. रंगविलेल्या अन्य भिंतींमुळे या फलकामागील काळपट पडलेली भिंत मात्र नागरिकांचे लक्ष वेधून घेताना दिसते.