प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील कचराकुंडय़ा हटवून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच ठिकठिकाणी कचरा टाकू नये, असे फलक देखील लावण्यात येत आहेत. पण नागरिक या सूचनेकडे दुर्लक्ष करून फलकाच्या समोरच कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मनपाकडून कोणावर कारवाई होणार, असा मुद्दा उपस्थित होत आहे.
शहराच्या स्वच्छतेसाठी मनपाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पण शहरातील नागरिकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कुंडीबाहेर कचरा टाकू नये तसेच रस्त्याशेजारीही टाकू नये, असे सातत्याने आवाहन करूनदेखील नागरिक दुर्लक्ष करीत असतात. त्यामुळे लक्ष्मी गल्ली, वडगाव येथील कचराकुंडीच्या ठिकाणी फलक लावून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तरीदेखील नागरिक फलकाच्या ठिकाणीच कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मनपाकडून कोणावर कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात
आहे.