प्रतिनिधी/ बेळगाव
केबल, पाईप लाईन घालणे अशा कोणत्या ना कोणत्या कामाच्या निमित्ताने चांगले असलेले रस्ते खोदायचे आणि रस्ता खोदताना बाहेर काढलेले मातीचे ढिगारे तसेच ठेवून खड्डे निर्माण करून त्या कामाकडे दुर्लक्ष करायचे, हेच महानगरपालिकेचे सध्याचे कामाचे सूत्र दिसते आहे. शहरातील असंख्य रस्त्यांची मनपानेच अशी दूरवस्था करून ठेवली आहे.
एकीकडे स्मार्टसिटीची कामे सुरू आहेत तर दुसरीकडे खोदकामामुळे स्मार्टपणा नष्ट होऊन शहर कुरुप होऊ लागले आहे. भाग्यनगरच्या चौथ्या आणि पाचव्या क्रॉसच्या रस्त्याचीसुद्धा अशीच दूरवस्था झाली आहे. हरिमंदिरहून भाग्यनगर आणि आदर्शनगरला जाणाऱया रस्त्यावर असंख्य प्रमाणात गतिरोधक आहेत. चांगल्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीट करण्यासाठी मनपा ते रस्ते उखडत आहे. त्याचप्रमाणे भूमिगत वीजवाहिन्या घालण्यासाठीसुद्धा रस्ते खोदण्यात आले आहेत. मात्र, ठिकठिकाणी त्यासाठी खड्डे निर्माण करून ते तसेच ठेवण्यात आले आहेत. या खड्डय़ांमध्ये सातत्याने माणसे पडत असून त्यांना इजा होत आहे.
महानगरपालिका केवळ विविध स्वरुपाचे कर वाढविते आणि ते जनतेवर लादते. परंतु चांगल्या दर्जाचे रस्ते देण्याकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष करते. वास्तविक रस्ता खोदल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी खडी घालून रस्ता पूर्णपणे नीट करणे आवश्यक आहे. भाग्यनगरच्या दुसऱया क्रॉसवरील मुख्य रस्ता महानगरपालिकेने असाच खोदून ठेवला आहे. जर महानगरपालिकेने लवकरात लवकर त्याकडे लक्ष दिले नाही तर लोकांना आंदोलनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मनपाने तातडीने हे खड्डे बुजवावेत आणि रस्ते नीट करावेत, अशी मागणी होत आहे.