काही कार्यकर्त्यांनी केल्या उपायुक्तांना सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
महसुल विभाग हा महापालिकेचा महत्वाचा पाया आहे. मात्र हा पायाच ढासळला आहे. मिळकत धारकांच्या हक्काबाबतच निर्णय त्या ठिकाणी प्रलंबित राहत आहेत. याचबरोबर या विभागामुळेच महसुलामध्ये वाढ होत असते. पण गेल्या वर्षभरापासून या विभागाचा कारभार अनागोंदी सुरु आहे. साधा उतारा देखील मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे विविध कार्यकर्त्यांनी महापालिका उपायुक्तांची भेट घेऊन अधिकाऱयांना या कारभाराबद्दल चांगलेच खडसावले.
शासनाने नवीन पध्दतीने उतारा नोंद, पीआयडी क्रमांक याची नोंद करण्यास सांगितले आहे. मात्र कोरोनामुळे ते कामात व्यस्थ असल्याचे सांगण्यात येत आहे. नवीन संगणक तसेच कर्मचाऱयांची भरती करणे गरजेचे आहे. या नवीन संगणकाच्या आधारेच सर्व दस्तावेज नव्याने संगणकामध्ये समाविष्ट करता येणार आहेत. मात्र अजूनही जुन्या पध्दतीनेच नोंद सुरु आहे. त्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. तेंव्हा टप्प्याटप्प्याने जुनी पध्दत कमी करुन नवीन पध्दत अवलंबावी, असे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.
एखादी प्रक्रिया सुरू झाली तर त्याला उशीर लागणार आहे. तेंव्हा जुन्यापध्दतीने नोंदणी सुरु असताना नवीन पध्दतीने त्याची नोंदणी करावी. त्यामुळे पुढीलप्रक्रिया सोपी जाणार आहे, अशी सूचना करण्यात आली. ई-अस्थीमधून आतापर्यंत केवळ एकच उतारा देण्यात आला आहे. यावरुन जनतेची कशी गैरसोय झाली आहे? हे दिसून येते. एखाद्याला उतारा हवा असेल तर खाते बदल करायचे असेल तर त्वरीत ते काम झाले पाहिजे. त्यासाठी प्रक्रिया राबवा, असे सांगण्यात आले. यावेळी सुनील जाधव, नितीन जाधव, संजय नाईक, शिवानंद पाटील उपस्थित होते.