जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांची लुबाडणूक : एजंटांचा वावर वाढण्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारीच जबाबदार
प्रतिनिधी / बेळगाव
जन्म-मृत्यूची नोंद करणे बंधनकारक आहे. याबाबतची नोंद करून महापालिकेकडून दाखले देण्यात येत होते. पण सेवा केंद्रावर दाखले देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने महापालिकेतून दाखले देण्याचे बंद करण्यात आले आहे. परिणामी महापालिका कार्यालयात दाखले देणाऱया एजंटांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
महापालिकेच्या दप्तरात जन्म-मृत्यूची नोंद झाल्यानंतर जन्म व मृत्यूचा दाखला दिला जात होता. त्यामुळे नागरिकांना चांगली सुविधा मिळत होती. दाखले मिळविण्यासाठी या ठिकाणी गर्दी होत होती. गर्दी टाळण्यासाठी आणि नागरिकांना दाखले मिळविणे सोयीचे व्हावे, या उद्देशाने संगणकीकरण करण्यात आले आहे. या माध्यमातून जन्म-मृत्यू दाखले सेवा केंद्रावर उपलब्ध करून देण्याची योजना राबविण्यात आली. सेवा केंद्रावर दाखले देण्यात येत असल्याने महापालिका कार्यालयातील दाखले देण्याचे काऊंटर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. केवळ जन्म दाखल्यावरील नावनोंदणीसाठी किंवा दाखल्यातील चुकीची दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेत अर्ज स्वीकारले जातात.
नागरिकांच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन एजंटांकडून दिशाभूल
चुकीच्या दुरुस्तीसाठी अर्ज करणाऱया नागरिकांना एजंट गाठत असल्याचे निदर्शनास येत आहे. महापालिका कार्यालयातील कर्मचारी असल्याचे सांगत आहेत. तसेच नावातील दुरुस्तीसाठी हवी तेवढी रक्कम सांगत असल्याचे निदर्शनास आले आहे. कक्षाच्या बाहेर नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यासाठी दोन कर्मचाऱयांची नियुक्ती केली आहे. तरीदेखील जन्म-मृत्यू दाखला कक्षाकडे येणाऱया नागरिकांची अडवणूक करून काय काम आहे? अशी विचारणा करीत आहेत. त्यामुळे सदर व्यक्ती महापालिकेतील कर्मचारी आहे का? याची चाचपणी करीत नाहीत. नागरिकांच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन एजंट दिशाभूल करीत आहेत.
आवश्यक कारवाईची गरज…
जन्म-मृत्यू दाखल्यासाठी अर्ज भरून देण्याकरिता एकच व्यक्ती प्रवेशद्वाराजवळ थांबून असायची. पण आता या ठिकाणी चार ते पाच व्यक्ती अर्ज भरून देण्याच्या नावाखाली नागरिकांची लूट करीत आहेत. मनपा आवारात एजंटांचा वावर वाढण्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. येथील एजंटगिरी बंद करण्यासाठी महापालिकेकडून किमान एक दाखला देण्याची सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. वास्तविक पाहता महापालिकेकडून वर्षानुवर्षे दाखले दिले जातात. सध्या हे दाखले सेवा केंद्रावर उपलब्ध आहेत, याची माहिती नागरिकांना नाही. त्यामुळे दाखल्यासाठी मनपात येणाऱया नागरिकांना दाखले देऊन पुढीलवेळी सेवा केंद्रावर दाखले घेण्याची सूचना करावी, अशी मागणी होत आहे. महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱयांनी याकडे लक्ष देऊन आवश्यक कारवाई करावी, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.