जीर्ण-धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष : चव्हाट गल्लीतील इमारत हटविण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
पावसाळय़ात धोकादायक घरांची पडझड होत असते. पण धोकादायक घरांमध्ये रहिवासी नसल्याचे सांगून महापालिकेकडून दुर्लक्ष केले जाते. मात्र, शेजारी राहणाऱया रहिवाशांना धोकादायक इमारतीचा फटका बसत आहे. चव्हाट गल्ली येथे जीर्ण झालेली इमारत हटविण्याची मागणी सातत्याने करूनही दुर्लक्ष करण्यात आले आहे. या ठिकाणी जीवितहानी होण्याची प्रतीक्षा महापालिका प्रशासन करीत आहे का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
शहराच्या विविध भागात जीर्ण इमारती असून, पावसाळय़ात या इमारती कोसळतात. बाजारपेठ असो किंवा अन्य रस्ते अशा इमारती आजही आहेत. पावसाळय़ाला सुरुवात होताच खडेबाजार परिसरात इमारत कोसळली. त्याचप्रमाणे शिवाजीनगर परिसरातदेखील दोन इमारतींच्या भिंती कोसळून नुकसान झाले. खडेबाजार गणपत गल्ली कॉर्नर येथील इमारत जीर्ण झाल्याची तक्रार महापालिकेकडे केली आहे. चव्हाट गल्ली येथील जुन्या घराची भिंत कोसळल्याने काही भागाची पडझड झाली आहे. त्यामुळे सदर इमारत हटविण्याची तक्रार महापालिकेकडे करण्यात आली होती. पण याची दखल मनपाच्या अधिकाऱयांनी घेतली नाही. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे.
चव्हाट गल्ली, राजवाडा हॉटेलच्या मागील बाजूस असणाऱया घराचा काही भाग कोसळला आहे. येथे लहान रस्ता असल्याने नागरिकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे या धोकादायक इमारतीचा भाग कोसळल्यास नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. सदर इमारत मागील दोन वर्षांपासून ढासळत आहे. त्यामुळे अनर्थ घडण्यापूर्वी इमारत हटविण्यासाठी मनपाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी तक्रार करण्यात आली.
नागरिकांना धोकादायक…
महापालिकेच्या अधिकाऱयांना याबाबत कोणतेच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. धोकादायक घरांमध्ये कोणी वास्तव्यास नसते. त्यामुळे कोणतीच जीवितहानी होऊ शकत नाही, असे मत महापालिकेच्या अधिकाऱयांचे आहे. पण शेजारी असलेल्या किंवा रस्त्यावरून ये-जा करणाऱया नागरिकांना अशा इमारतींमुळे इजा होऊ शकते. त्यामुळे चव्हाट गल्लीसह गणपत गल्ली कॉर्नरजवळील जीर्ण इमारतीची पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.