खानापूर तालुका म. ए. समितीचे तहसीलदारांना निवेदन
वार्ताहर / खानापूर
बेळगाव महानगरपालिकेवर काही मुठभर कानडी लोकांनी लाल-पिवळा ध्वज उभारून एकप्रकारे राष्ट्रद्रोहच केला आहे. दोन महिन्यांपूर्वी लावण्यात आलेला हा ध्वज हटविण्यात यावा, अशी मागणी अनेकवेळा करूनही याकडे जिल्हा प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे. बेळगाव महानगरपालिकेवर आतापर्यंतच्या इतिहासात लाल-पिवळा ध्वज कधीही लावण्याचा प्रकार झाला नाही व तसा लावण्याचा नैतिक व कायदेशीर अधिकारही कोणाला नाही. असे असताना या लाल-पिवळय़ासंदर्भात जिल्हा प्रशासनाने कोणतीच दखल न घेणे हा राष्ट्राचा अवमान असून लाल-पिवळा उभा केलेल्या त्या कन्नडिगांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून सदर लाल-पिवळा हटविण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने तहसीलदारांना देण्यात आले. सोमवारी खानापूर तालुका म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.
बेळगाव तसेच येथील महानगरपालिकाही सीमालढय़ाचा केंद्रबिंदू आहे. असे असताना अनधिकृतरित्या या महानगरपालिकेवर लाल-पिवळा ध्वज फडकावून एकप्रकारे मराठी भाषिकांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात काही कन्नड संघटनेच्या म्होरक्मयानी अनधिकृतरित्या लाल-पिवळा ध्वज उभारला. तेव्हापासून मराठी भाषिक जनतेत संतापाची लाट उसळली आहे. हा ध्वज काढण्यात यावा, अशी मागणी अनेकवेळा समितीच्यावतीने करण्यात आली. पण याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनच या प्रकाराला खतपाणी घालत आहे असे म्हणावे लागेल, असे मत माजी आमदार दिगंबर पाटील यांनी व्यक्त
करून तहसीलदारांना निवेदन सादर केले. सदर निवेदन देताना तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, चिटणीस आबासाहेब दळवी, कार्यकारिणी सदस्य शिवाजी पाटील, अरुण सरदेसाई, डी. एम. भोसले, जयराम देसाई, श्रीकांत दामले, मुरलीधर पाटील, बाळाराम शेलार, नारायण कापोलकर, मऱयाप्पा पाटील, लक्ष्मण कसर्लेकर, गणपती गावडे, अमृत पाटील, म्हात्रू धबाले आदी उपस्थित होते.