तरुण भारतच्या वृत्ताची घेतली दखल : काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तपासणी न करताच त्यांना स्थानकाबाहेर सोडले जात असल्याने धोका वाढल्याचे वृत्त बुधवारी तरुण भारतने दिले होते. ही बाब गंभीर असल्याने बुधवारी रात्री मनपा आयुक्त रूदेश घाळी व आरोग्य अधिकारी संजय डुमगोळ यांनी रेल्वे स्थानकाला भेट दिली. काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी करावी असे आदेश त्यांनी रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱयांना दिले.
परराज्यातून येणाऱया प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. प्रवास करण्यासाठी या चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत असणे आवश्यक आहे. असे असताना बेळगाव रेल्वे स्थानकावर मात्र पर राज्यातून दररोज शेकडो प्रवासी खुलेआम शहरात येत आहेत. रेल्वे स्थानकावरील मुख्य प्रवेशद्वार सोडून इतर पर्यायी मार्गाने प्रवासी बाहेर पडत आहेत. कोणतीही तपासणी नसल्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती शहरवासीयांमधून व्यक्त केली जात होती.
तरुण भारतने या निष्काळजीपणावर आवाज उठविला. तपासणी न करता प्रवासी शहरात येत असल्याने धोका व्यक्त करण्यात आला होता. बेळगाव रेल्वे स्थानकावर गोवा, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, केरळ, मध्यप्रदेश, दिल्ली येथील प्रवासी येत असल्यामुळे त्यांची तपासणी होणे आवश्यक होते. परंतु अधिकारी वर्गाच्या निष्काळजीपणामुळे प्रवासी तपासणीविनाच बाहेर पडत होते. यावर निर्बंध घालण्याची मागणी करण्यात येत होती.
बुधवारी रात्री मनपा आयुक्त व आरोग्य अधिकाऱयांनी रेल्वे स्थानकाला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली.
नेमण्यात आलेले आरोग्य कर्मचारी व इतर कर्मचाऱयांना कोरोना नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच कोणतीही हयगय झाल्यास त्यावर कारवाईचा इशाराही अधिकाऱयांनी दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.