खासबाग, आझमनगर येथे प्रकल्प उभारण्याचा विचार :15 व्या वित्त आयोग अनुदानातून निधीची तरतूद
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात दररोज अडीचशे टनहून अधिक कचरा जमा होत आहे. कचऱयावर प्रक्रिया करण्यात येणाऱया तुरमुरी डेपोत जागा शिल्लक राहिली नाही. त्यामुळे ओल्या कचऱयावर प्रक्रिया करून गॅस निर्मिती करण्यासाठी महापालिका दोन ठिकाणी बायोगॅस प्रकल्प राबविणार आहे. त्याकरिता 70 लाखांची तरतूद 15 व्या वित्त आयोग अनुदानातून केली आहे.
शहरात दोन ठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेकडून लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शहर आणि उपनगरात घरोघरी जावून कचऱयाची उचल केली जाते. ओला आणि सुका कचरा वेगळा केला जातो. तसेच बाजारपेठेत आणि भाजीमार्केट परिसरात ओल्या कचऱयाची उत्पत्ती मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्यामुळे दररोज अडीचशे टनाहून अधिक कचरा जमा होत आहे.
जमा झालेला कचरा तुरमुरी डेपोत पाठवून त्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती केली जाते. पण कचरा डेपोची क्षमता कमी असून दररोज 200 टन कचऱयावर प्रक्रिया करता येवू शकते. त्यामुळे तुरमुरी कचरा डेपोत कचऱयावर प्रक्रिया करण्यासाठी जागा अपुरी पडू लागली आहे.
कचऱयापासून बायोगॅस आणि विद्युत निर्मिती प्रकल्प राबविण्याची सूचना प्रशासनाने केली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने यापूर्वी एपीएमसी मार्केट यार्डमध्ये बायोगॅस प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव तयार करून निविदा मागविण्यात आली होती. मात्र निविदा प्रक्रियेला प्रतिसाद लाभला नसल्याने पुन्हा नव्याने निविदा काढण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरात आणखी दोन ठिकाणी बायोगॅस प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
आराखडा तयार
500 किलो कचऱयापासून बायोगॅस निर्माण करण्यासाठी दोन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. याकरिता 15 व्या वित्त आयोग अनुदानातून निधीची तरतूद करण्यात आली आहे. खासबाग कचरा डेपो परिसर आणि आझमनगर येथील इंदिरा कॅन्टीनशेजारच्या जागेत हे प्रकल्प उभारण्याचा विचार मनपाने चालविला आहे. हे प्रकल्प राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून जिल्हाधिकाऱयांच्या परवानगीनंतर पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.