अनधिकृत ध्वजाला पोलीस संरक्षण : दोन महिन्यांपासून डोळय़ात तेल घालून पहारा
प्रतिनिधी / बेळगाव
काही कानडी संघटनांनी महापालिका कार्यालयासमोर लाल-पिवळा ध्वज लावला असून सदर ध्वज हटविण्याची मागणी करून आंदोलन छेडले आहे. मात्र, अनधिकृत ध्वज हटवून निर्माण झालेल्या वादावर पडदा घालण्याऐवजी अनधिकृत ध्वजाला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यालयासमोर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने पोलीस छावणीचे स्वरुप आले होते.
महापालिकेच्या प्रवेशद्वारावर अनधिकृतरीत्या लाल-पिवळा ध्वज लावण्यात आला असून, सदर ध्वज हटविण्याऐवजी पोलीस प्रशासनाकडून संरक्षण देण्यात आले आहे. सदर ध्वज हटवू नये याकरिता पोलीस प्रशासन मागील दोन महिन्यांपासून या ठिकाणी डोळय़ात तेल घालून पहारा देत आहे. वास्तविक पाहता तिरंग्यासमोर हा ध्वज लावण्यात आल्याने तिरंग्याचा अवमान होत आहे. याची जाणीव असूनही जिल्हा प्रशासनाने ध्वज हटविण्यास टाळाटाळ चालविली आहे. त्यामुळे अनधिकृत ध्वज हटविण्यात यावा, अशी मागणी करून म. ए. समितीच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात
आला.
या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यालयासमोर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महापालिका कार्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून बंद ठेवण्यात आले होते. कार्यालयात ये-जा करणाऱया नागरिकांना एस. पी. ऑफीससमोर अडविण्यात येत होते. महापालिका कार्यालयासभोवती असलेले सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या रुग्णालयात ये-जा करणाऱया नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय झाली. दवाखान्यात जात असल्याचे सांगूनही पोलिसांनी सोडले नाही. त्यामुळे वीरभद्रनगरकडून दवाखान्यात यावे लागले.
महापालिका कार्यालयात काम करणाऱया कर्मचाऱयांनाही कार्यालयात सोडण्यास टाळाटाळ करण्यात आली. कर्मचाऱयांना प्रमुख प्रवेशद्वाराने ये-जा करण्यास मज्जाव करून मागील दरवाजाने कार्यालयात जाण्यास सांगितले. त्यामुळे कर्मचाऱयांना देखील पोलीस बंदोबस्ताचा फटका बसला. महापालिकेच्यावतीने गरजूंना लॅपटॉप वितरित करण्यात येतो. त्याकरिता लॅपटॉपची डिलिव्हरी देण्यासाठी आलेल्या वाहनालादेखील पोलिसांनी परत पाठविले. त्यामुळे महापालिका कर्मचाऱयांची गोची झाली.
नागरिकांतून नाराजी
कंपनीने पाठविलेले लॅपटॉप अखेर विभागीय कार्यालयात उतरवून घ्यावे लागले. पोलीस बंदोबस्ताचा त्रास नागरिकांनादेखील मोठय़ा प्रमाणात सहन करावा लागला. लाल-पिवळय़ाच्या संरक्षणासाठी ठेवलेल्या बंदोबस्तामुळे सोमवारी दिवसभर नागरिकांना महापालिका कार्यालयात सोडण्यात आले नाही. जन्म-मृत्यू दाखला घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना मुख्य रस्त्यावरूनच परतावून लावण्यात आले. विविध कामासाठी आलेल्या नागरिकांना अर्ध्यावरूनच परतावे लागले. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.